राजकीय दबावामुळे घोषणा : कठोर निर्बंध शिथिल
बेंगळूर : कोरोना संसर्ग कमी झालेल्या आणखी 6 जिल्हय़ांमध्ये सोमवारी अनलॉक 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये विजापूर, शिमोगा, बळ्ळारी, चित्रदुर्ग, उडुपी आणि बेंगळूर ग्रामीण या जिल्हय़ांचा समावेश आहे. उर्वरित म्हैसूरसह 7 जिल्हय़ांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने तेथे कठोर नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली नाही. राज्य सरकारने दुसऱया टप्प्यातील अनलॉकची घोषणा करताना 16 जिल्हय़ांमधील निर्बंध आणखी शिथिल करून सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. मात्र, राजकीय दबाव वाढल्यामुळे राज्य सरकारने संसर्ग कमी झालेल्या अनलॉकच्या यादीत आणखी सहा जिल्हय़ांचा समावेश केला आहे.
अनलॉक झालेल्या जिल्हय़ांमध्ये आंतराज्य बसेसवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. सर्व दुकाने सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वातानुकूलन व्यवस्था (एसी) बंद ठेवून 50 टक्के क्षमतेने हॉटेल, क्लब, रेस्टॉरंट सुरू असतील.