तब्बल ३६ वर्षानंतर राज्य सरकारने विठुरायाला अर्पण केलेले सोन्या-चांदीने दागिने वितळविण्यासाठी परवानगी दिली आहे. गेल्या ३६ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता . गोरगरीब भाविकांनी अर्पण केलेले हे लहान दागिने देवाला वापरता येत नसल्यामुळे गेली वर्षानुवर्षे हे पोत्यात बांधून ठेवण्यात आले होते. या लहान दागिन्यांमध्ये २८ किलो सोने आणि ९९६ किलो चांदीचे दागिने आहेत.
कार्तिकी यात्रेनंतर सोने आणि चांदीच्या दागिन्यातील दोरे, खडे, हिरे आणि मानके वितळविण्यात येणार असून पाच जणांच्या समितीच्या देखरेखीखाली वेगळे करून व्यवस्थित ठेवले जाणार आहे.उरलेले सोने आणि चांदी यांचा विमा उतरवून सुरक्षितपणे मुंबई येथे वितळविण्यासाठी नेण्यात येणार आहे. सुरुवातीला सर्व सोने आणि चांदी वितळवून त्याचे दोन-दोन सॅम्पल तुकडे बाजूला काढले जाऊन मग सर्व सोने-चांदीचे शुद्धीकरण केले जाणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार या दागिन्यांमधून निघणाऱ्या शुद्ध सोने आणि चांदीच्या विटा बनविण्यात येऊन त्या मंदिर समितीकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. यासाठी मंदिर समितीच्या सदस्यांची निवड आणि सोने वितळविण्यासाठीची तारीख मंदिर समितीच्या बैठकीत केली जाणार आहे. राज्य सरकारने नेमलेले सहसचिव कऱ्हाळे यांना दहा दिवसांसाठी मंदिराकडे नियुक्त केले जाणार असल्यामुळे आता कार्तिकी यात्रेनंतर तातडीने ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.यामुळे भक्तांनी विठुरायाला अर्पण केलेले सोने देवाजवळ कायमस्वरूपी राहणार आहे.