शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची माहिती : दुसऱया टप्प्यात वितरण न झालेल्या शाळांना लॉकडाऊन संपता क्षणीच धान्यसाठा
प्रतिनिधी / बेंगळूर
काही शाळांमधील विद्यार्थ्यांना देणे बाकी असलेले दुसऱया टप्प्यातील आहारधान्य मे अखेरपर्यंत पूर्ण प्रमाणात वितरीत करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
बेंगळूरमधील विधानसौध येथे शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराऐवजी देण्यात येणारे खाद्यतेल व इतर धान्ये देणे बाकी आहे. ते लॉकडाऊन संपताक्षणीच वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आहार धान्यासाठी नुकताच अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराऐवजी, खाद्यतेल पाकिटे, तांदूळ, तुरडाळीचे वितरण केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील 108 दिवसांचे आहारधान्य सर्व शाळांना वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंतच्या 132 दिवसांचे आहारधान्य काही शाळांना वितरीत करण्यात आले होते. मात्र, कोरोना कर्फ्यू व लॉकडाऊन जारी झाल्याने काही शाळांना दुसऱया टप्प्यातील आहारधान्य देणे शक्य झाले नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच ही प्रक्रिया सुरू करून उर्वरित शाळांसाठी मे महिना संपण्यापूर्वी आहारधान्य वितरीत करण्याची सूचना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
तूरडाळ वितरणासाठी 27 एप्रिल रोजी आणि खाद्यतेल पुरवठेदारांना 7 मे रोजी कार्यादेश देण्यात आले आहेत. साठा असणारे धान्य डीडीपीआय व जिल्हा पंचायत सीईओंशी चर्चा करून त्वरित वितरणाची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळेत हजर राहून दुसऱया टप्प्यातील आहारधान्य वितरण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. सरकारी शाळांना देण्यात येणारा निधी स्वतःच्या खात्यात ठेवून घेतलेल्या अधिकाऱयांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना खात्याच्या आयुक्तांना देण्यात आली आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीप्रसंगी प्राथमिक-माध्यमिक शिक्षण खात्याचे अप्पर मुख्य सचिव कुमार नायक, सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्त व्ही. अन्बुकुमार, मध्यान्ह आहार योजना आणि शिक्षण खात्याचे इतर अधिकारी उपस्थित होते.