शिक्षण खात्याकडून मार्गसूची जारी : पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये 17 पासून सुरू
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे अद्यापही बंद असणारी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य सरकारने तयारी केली आहे. 17 नोव्हेंबरपासून अभियांत्रिकी, डिप्लोमासह पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्याकरिता शिक्षण खात्याने मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार सर्व विद्यार्थी, प्राध्यापकांना कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य असणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र सादर करावे लागणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार शिक्षण खात्याने मार्गसूची जारी केली आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालये सुरू करण्याआधी तीन दिवस विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक आणि महाविद्यालयीन कर्मचाऱयांना कोरोना चाचणी करून घेणे सक्तीचे आहे. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच संबंधितांना महाविद्यालयात प्रवेश दिला जावा. विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्रही सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तर प्राध्यापकांना मास्कबरोबरच फेस शिल्ड वापरणे बंधनकारक राहणार आहे. तसेच अनुपस्थित राहणाऱया विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे.
आसनव्यवस्था करताना विद्यार्थ्यांमध्ये किमान 6 फूट अंतर असावे. स्वच्छता, शुद्ध पेयजल, निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. खासगी वाहने, महाविद्यालयाच्या बसेसचे नियमित सॅनिटायझिंग करावे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यहितासाठी आरोग्य समिती स्थापन करावी. महाविद्यालय आवारात थुंकण्यावर निर्बंध घालावेत. विद्यार्थ्यांनी सक्तीने आरोग्य सेतू ऍप इनस्टॉल केलेले असावे, असे सुचित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेखातर महाविद्यालयांमधील कॅन्टीन, वाचनालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांनी घरातूनच खाद्यपदार्थ-पाणी आणावे,. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, एसीसी, एनएसएस उपक्रम सुरू करू नयेत. प्रयोगशाळा आणि प्रकल्प वर्ग वेगवेगळय़ा टप्प्यात घ्यावेत. प्रत्येक महाविद्यालयाने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडून महाविद्यालय परिसराच्या सुरक्षेबाबत पडताळणी करून घ्यावी. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱयांनी मास्क परिधान केले आहे का?, याची महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच खातरजमा करून घ्यावी. खोकला, सर्दी, ताप, घशासंबंधी त्रास असणाऱयांना महाविद्यालय प्रवेश दिला जाऊ नये, असेही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
आवश्यकतेनुसार महाविद्यालयीन वेळेत बदल किंवा वाढ करण्याची मुभा असेल. वर्गखोल्या, जागेची उपलब्धता याच्या आधारे 50 टक्के विद्यार्थ्यांना एका वेळी हजर राहण्याची व्यवस्था करावी. याकरिता रोटेशन पद्धतीचा अवलंब करता येणार आहे.