पश्चिम बंगालमध्ये 8, आसाममध्ये 3 टप्प्यात मतदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात मार्च-एप्रिल महिन्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून सर्व राज्यांमधील निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत निडवणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत मतदान होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आता विधानसभेच्या 824 जागांसाठी मतदान होणार आहे. पाच राज्यात 2.7 लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, 18.6 कोटी मतदार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मतदान करण्यासाठी एक तासाचा वेळही वाढवून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. देशभरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे या विधानसभा निवडणुका होत आहेत. आसाममध्ये भाजपाचे सरकार आहे. तर, पुदुच्चेरीत मागील आठवडय़ातच काँग्रेसचे सरकार कोसळल्याने तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे.
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान
भाजप-तृणमूल काँग्रेसच्या संघर्षामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान 27 मार्च (30 मतदारसंघ), दुसरा टप्पा 1 एप्रिल (30 मतदारसंघ), तिसरा टप्पा 6 एप्रिल (31 मतदारसंघ), चौथा टप्पा 10 एप्रिल (44 मतदारसंघ), पाचवा टप्पा 17 एप्रिल (45 मतदारसंघ), सहावा टप्पा 22 एप्रिल (43 मतदारसंघ), सातवा टप्पा 26 एप्रिल (36 मतदारसंघ) आणि आठवा टप्पा 29 एप्रिल (35 मतदारसंघ) रोजी होणार आहे. 2016 मध्ये झालेल्या मागील निवडणुकीत येथे सात टप्प्यात मतदान झाले होते.
आसाममध्ये तीन टप्प्यात
आसाममध्ये विधानसभेच्या एकूण 126 जागा असून राज्यात तीन टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च रोजी होणार असून 47 मतदारसंघात मतदान होईल. त्यानंतर 1 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यासाठी 39 मतदारसंघात आणि 6 एप्रिल रोजी तिसऱया टप्प्यासाठी 40 मतदारसंघात मतदान होणार आहे. येथेही निवडणुकीचा निकाल 2 मे रोजीच जाहीर होईल.
तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीत 6 एप्रिलला मतदान
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा असून संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल. सर्व 234 मतदारसंघात 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच 140 जागा असलेल्या केरळ आणि 30 जागा असलेल्या पुदुच्चेरीमध्ये 6 एप्रिल रोजीच मतदान होणार आहे. येथील मतदान पार पडल्यानंतर निकालासाठी जवळपास महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पश्चिम बंगालकडे सर्वांचे लक्ष
पश्चिम बंगालमध्ये आधीपासून निवडणुकीचे वारे वाहत आहे. आज निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरतील. सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे सरकार सत्तास्थानी आहे. मात्र, यावेळी भाजपने 200 हून अधिक जागा आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी महिन्याभरापूर्वीपासूनच सभा-मेळावे सुरू झाले आहेत. राज्यात तृणमूलचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. येथे अनेकदा नेत्यांवर हल्ल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. याखेरीज डावे पक्ष आणि काँग्रेसच्या युतीमुळे बंगालचे राजकारण आणखी रंजक झाले आहे.
आसाममध्ये भाजप-काँग्रेस चुरस
126 जागा असलेल्या आसाम राज्यात सध्या भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आहे. येथे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपने येथे 60 जागा जिंकल्या होत्या. यावेळी येथे काँग्रेसही विजयाचा दावा करीत आहे. परंतु, मागील निकाल पाहता काँग्रेस 122 जागा लढवून केवळ 26 जागा जिंकू शकली. येथे सरकार स्थापन करण्यासाठी 64 जागांची आवश्यकता आहे.
तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांची चलती
234 मतदारसंघ असणाऱया तामिळनाडूमध्ये सत्तेत येण्यासाठी 118 हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत येथे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम (अण्णाद्रमुक) येथे सरकार चालवत असून पलानीस्वामी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत एआयएडीएमकेने 135 जागा जिंकल्या, तर मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने 88 जागा जिंकल्या होत्या.