सत्तधाऱयांसह विरोधी पक्षानेही आखली रणनीती : सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक एकत्र
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेचे तीन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आज बुधवार दि. 28 जुलैपासून सुरू होत असून त्याला तोंड देण्यासाठी सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष तसेच सरकारची कसोटी लागणार असून विविध ज्वलंत विषयांवर सरकारला कोंडीत पकडण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षात अधिवेशनात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या मंत्र्यांची व आमदारांची वेगळी बैठक घेण्यात आली आणि विरोधी पक्षांना रोखण्यासाठी काय करावे, कसे करावे या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि संघटनमंत्री सतीश धोंड उपस्थित होते. मंत्र्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलू नये तसेच आमदारांनीदेखील सरकारविरोधात तसेच मंत्र्यांविरोधात भाष्य करू नये, अशी समज त्यांना देण्यात आली आहे.
सर्व विरोधक आले एकत्र
दरम्यान, सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष त्यांचे आमदार एकत्र आले असून सर्वश्री दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, प्रसाद गावकर, यांची एकत्र बैठक झाली. काँग्रेसचे इतर आमदार मात्र बैठकीला उपस्थित नव्हते.
अधिवेनात गोंधळ होण्याचीच लक्षणे
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे अधिवेशन कदाचित शवटचे ठरण्याची शक्यता दिसत असल्याने सत्ताधारी पक्ष व सरकारने मोठे कामकाज फक्त 3 दिवसांत करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अधिवेशन रोज रात्री उशिरापर्यंत चालेल असा अंदाज असून कामकाज सुरळीत होण्यापेक्षा विधानसभेत गोंधळ अधिक होण्याची लक्षणे दिसत आहेत.
विधानसभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवरील प्रश्न चर्चेला येणार असून त्यावर सरकारची धोरणे काय आहेत, ते देखील स्पष्ट होणार आहे. विविध प्रकारची विधेयके, लक्षवेधी सूचना खासगी ठराव विधनसभेत चर्चेला येणार आहेत. सत्ताधारी -विरोधी पक्ष असा सामना विधानसभेत रंगण्याची चिन्हे आहेत.
उत्तर गोव्यात 144 कलम लागू
दरम्यान, बुधवार दि. 28 ते 30 जुलै या कालावधीत विधानसभा अधिवेशनानिमित्त मोर्चा, धरणे, निदर्शने अशी आंदोलने होण्याची शक्यता गृहित धरून ती रोखण्यासाठी उत्तर गोव्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांनी तसा आदेश जारी केला आहे.
त्या आदेशानुसार उत्तर गोवा जिल्हय़ात सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, चौक, गल्ली किंवा कोणत्याही खुल्या जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. विधानसभेच्या आसपास ध्वनिक्षेपक वापरास, घोषणाबाजी करण्यास बंदी घातली आहे. तिन्ही दिवस हा आदेश लागू राहणार आहे.