गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
आधीच ठरल्यानुसार दहा दिवसांचे विधानसभा अधिवेशन घेणे क्रमप्राप्त असतानाही केवळ तीन दिवसात कामकाज गुंडाळण्याचा फार्स सरकार करू पाहात आहे. हे अधिवेशन म्हणजे केवळ एक औपचारिकता ठरणार आहे, अशी जोरदार टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आमदार जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांचीही उपस्थिती होती. अधिवेशनापासून लोकांचे मन वळविण्यासाठी पूर्वनियोजित योजनेनुसार सरकारने मोफत वीज प्रश्नावर आप आणि भाजप या दोन वीजमंत्र्यांमध्ये चर्चेचा सोहळा घडवून आणला. राज्यात शेकडो प्रश्न आहेत. त्यांच्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. खाणी सुरू होण्याची आशा मावळली आहे. पूरामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्थ झालेले आहेत. खून-बलात्काराच्या घटनांची मालिकाच सुरू आहे, कोरोनातून लोक अद्याप सावरलेले नाहीत, अशावेळी वीज प्रश्नावर चर्चा होणे खरोखरच महत्वाचे होते का? असे सरदेसाई म्हणाले.
भाजप सरकार असंवेदनशील
विद्यमान भाजप सरकार हे अत्यंत असंवेदनशील आहे. या सरकारला लोकशाहीची ऍलर्जी आहे. गोवा आणि गोमंतकीयांच्या सुखदुःखाबद्दल या सरकारला काहीही देणे घेणे नाही. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले, तर त्याचे खापर मुख्यमंत्र्यांनी ट्रक्टर चालकाच्या माथी फोडले. त्याने वेळेवर सिलिंडर इस्पितळात पोहोचविले नाहीत, म्हणून लोकांच्या प्राणावर बेतले, असे मुख्यमंत्री म्हणतात. ते जर खरे असेल तर खनिज किंवा कोळसा वाहतूक करणारा ट्रक किंवा ट्रेन भर मार्गावर बंद पडल्याचे कधी दिसून आले नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
कोरोनामुळे राज्यातील सर्व व्यवसाय, व्यवहार ठप्प झाले आहेत. लोक बेरोजगार झाले आहेत. परिणामी राज्याची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. यातून सावरण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. दुसऱया बाजूने सरकार कर्जाचे डोंगर वाढवत आहे. प्रत्येक मूल डोक्यावर लाखोंच्या कर्जाचा भार घेऊनच जन्माला येत आहे, असे सरदेसाई म्हणाले.
लोकांचे हाल होताना सरकार मात्र झोपेचे सोंग घेऊन वागत आहे. राज्यात सर्वत्र पूराने हाहाकार माजवलेला असताना जे. पी. नड्डा यांच्या स्वागतासाठी एवढा मोठा उत्सव आणि सोहळा करण्याची खरोखरच आवश्यकता होती का? असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अधिवेशनात गोमंतकीयांच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित करायचे होते. परंतु दहा दिवसांच्या जागी तीनच दिवसांचे अधिवेशन ठेऊन सरकारने पुन्हा एकदा लोकांना फसविले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
वीज मंत्रीपद मिळाल्यास गोव्याला हरित उर्जा
राज्यात पुढील सरकारात गोवा फॉरवर्डला वीज मंत्रीपद मिळाल्यास संपूर्ण गोव्यात सोलर फार्मस् स्थापन करून लोकांना अनुदानित दरात हरित उर्जा उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा आमदार सरदेसाई यांनी केली. कोळसा जाळून वीज निर्मिती करण्यास गोवा फॉरवर्डचा विरोध असल्याचे ते म्हणाले.
सरकारकडे स्वमालकीच्या कोटय़वधी चौ. मी. जमिनी आहेत. तेथे हे महासोलर फार्मस् स्थापन करून मुबलत वीज निर्मिती करणे शक्य आहे. ही वीज पर्यावरण पूरक तर असेलच. त्याद्वारे राज्यही वीज निर्मितीत आत्मनिर्भर बनेल, असे सरदेसाई म्हणाले. आम आदमी पक्षाने लोकांना 300 युनिट दरमहा वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे, त्यासंबंधी बोलताना सरदेसाई यांनी वरील घोषणा केली.
फॉरवर्डसोबत युतीसाठी काँग्रेसचा हिरवा कंदील येत्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत युती करण्यास तयार झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.