देशातील सर्वोत्कृष्ट खासदारांपैकी एक! – पालकमंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
विनायक राऊत हे देशातील सर्वोत्कृष्ट खासदारांपैकी एक आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हय़ात खऱया अर्थाने विकासाला चालना देण्याचे काम राऊत यांनी केले, असे गौरवोद्गार सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी काढले.
खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री सामंत यांनी त्यांच्या तळगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जि. प. गटनेते नागेंद्र परब, जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, बाबा आंगणे, छोटू पारकर, अवधूत मालणकर, जि. प. सदस्य प्रदीप नारकर, प्रभाकर परब उपस्थित होते. राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनीही तळगाव येथे राऊत यांच्या निवासस्थानी येऊन शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर व अन्य पदाधिकाऱयांनीही शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, खासदार विनायक राऊत यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात विकासाला चालना मिळाली. राजकारण बाजूला ठेवून त्यांनी अनेक विकासकामे केली. विशेष म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून आणले. जिल्हय़ाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे.
देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने हापूस आंब्यांचा हार घालून खासदार राऊत यांना गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, कुडाळ प्रांताधिकारी वैशाली खरमाळे तसेच विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही राऊत यांना शुभेच्छा दिल्या. अगदी सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी राऊत यांच्या निवासस्थानी जनतेची रेलचेल सुरू होती.