प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या सांबरा विमानतळावर प्रवाशांचा ओढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर 20 दिवसांपासून विमानसेवा पूर्वपदावर येत आहे. शनिवारी दिवसभरात 14 विमानांची उड्डाणे झाली. बेंगळूर, पुणे, अहमदाबाद, म्हैसूर, इंदूर, मुंबई, हैदराबाद या शहरांना उड्डाणे झाली. एकूण आजवरच्या सर्वाधिक 524 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
लॉकडाऊनला सुरुवात होताच पूर्णपणे बंद असलेली विमानसेवा 25 मेपासून पूर्ववत झाली आहे. बेळगावमधून सेवा देणाऱया सर्वच विमान कंपन्यांनी आपली सेवा पुन्हा सुरू केली आहे. इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते व रेल्वेमार्गे प्रवासी वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नसल्याने विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. दररोज प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.
बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा देण्यात आली आहे. विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. एका विमानाचे उड्डाण होताच संपूर्ण विमानतळ टर्मिनल सॅनिटाईज केले जात आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग करूनच प्रवाशांना बाहेर सोडण्यात येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे.