गोकुळ शिरगाव/ वार्ताहर
उजळाईवाडी विमानतळावर मंगळवारी सकाळची कोल्हापूर हैदराबाद विमान हवामानामुळे रद्द झाल्याने प्रवाशांनी इंडिगो कंपनीचे व्यवस्थापकांना धारेवर धरत सकाळी विमानतळावर मोठा गोंधळ केला. व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी उजळाईवाडी विमानतळावर प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. अशा घटना वारंवार होत असून उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळ सारखे चर्चेत येत आहे.
तिरुपतीला जाण्यासाठी दोन महिन्यापूर्वी 50 ते 60 प्रवाश्यांनी तिकीट बुक केले होते. मंगळवारी सकाळी हे प्रवासी तिरुपतीला जाण्यासाठी विमानतळावर आले. त्यावेळी विमानतळावरील इंडिगो कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱयांनी विमान हवामानामुळे रद्द झाल्याचे सांगितले. त्यामुळे प्रवाशी संतप्त झाले. प्रवाशांच्या या उदेकामुळे इंडिगो कंपनीच्या व्यवस्थापकांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी प्रवाशांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आता सेवा उपलब्ध करून दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्रा घेत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मंगळवारी हे सर्व प्रवासी कोल्हापूर वरुन बेळगाव व बेळगावहून चेन्नई येथे विमानाने जाणार होते. असे असताना मंगळवारी सकाळी पाच वाजल्यापासून काही प्रवासी पुणे, कोपरगाव, सातारा या भागातून प्रवासी उजळाईवाडी विमानतळावर दाखल झाले. विमान प्रवाशांनी फ्लाईट कधी सोडणार आहात याबाबत चौकशी केली असता हवामान खराब असल्याने विमान सोडले जाणार नसल्याचे विमानतळ येथील प्रशासकीय कर्मचायांनी प्रवाशांना सांगितले. यामधील प्रवासी डॉक्टर भारती कळवा पुणे, जितेंद्र पारेख सातारा, पुनम गुजराती कोपरगाव, मनोहर गुडचे, युवराज गिरे फुरसंगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांनी इंडिगो कंपनीचे व्यवस्थापकास धारेवर धरत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी सर्व प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन करून आपली सोय केली जाईल असे सांगण्यात आले. यावेळी काही प्रवाशांनी आपले तिकीट रद्द करून बेळगावला जाण्याचे पसंत केले. तर काही प्रवाशांना अर्ध्या तासानंतर जाणाऱया विमानाचे वेळापत्रक दिले.
मागील महिन्यातही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कोल्हापूर-मुंबई प्रवास करणाऱया प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.