नवी दिल्ली
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. आता श्रीलंकेविरुद्ध त्याची शतकमहोत्सवी कसोटी मोहालीमध्ये 4 मार्चपासून खेळविली जाईल. मात्र, सदर कसोटी सामना बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना असणार आहे, अशी माहिती पंजाब क्रिकेट संघटनेचे सीईओ दीपक शर्मा यांनी दिली.
लंका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत राहील. या मालिकेतील दुसरी कसोटी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कोहली आपली 100 वी कसोटी मोहालीत खेळेल. रोहित शर्माची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी प्रथमच नियुक्ती झाली आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 99 सामन्यांत 50.39 धावांच्या सरासरीने 7262 धावा जमविल्या असून त्यामध्ये 27 शतकांचा समावेश आहे.