वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयात भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिका गमवावी लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देवून अनेक क्रिकेट शौकिनांना अनपेक्षित धक्का दिला. विराट कोहली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील आतापर्यंत झालेल्या सर्वोत्तम कर्णधारापैकी एक असल्याचे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे. कोहलीचा कर्णधारपदाचा त्याग करण्याचा वैयक्तिक निर्णय असून या निर्णयाचे क्रिकेट मंडळ आदर करीत आहे.
भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर कप्तानपदाची जबाबदारी विराट कोहलीकडे बीसीसीआयने सोपविली होती. तब्बल सात वर्षांच्या कालावधीत कोहलीने भारतीय संघाला 68 पैकी 40 कसोटी सामने जिंकून दिले. भारतीय संघाला लाभलेला तो सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून नोंद झाली आहे. क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मारलेली मजल कौतुकास्पद आहे. कर्णधारपद सोडण्याचा विराटचा हा वैयक्तिक निर्णय असून मंडळ त्याच्या या निर्णयाचा आदर करीत असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी म्हटले आहे.
कोहली यापुढे संघाचा कर्णधार नसला तरी तो संघातील महत्त्वाचा सदस्य म्हणून राहील. क्रिकेट क्षेत्रातील त्याच्या भरीव योगदानामुळे भारतीय संघ विशिष्ट उंचीवर पोहोचला आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतो, असेही गांगुली यांनी म्हटले आहे. मध्यंतरी भारतीय क्रिकेट मंडळ आणि कोहली यांच्यातील संबंध ताणले गेले होते. कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून बाजुला करण्यात आले. कोहलीने 2015 साली कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर लंकेविरूद्धची पहिली कसोटी मालिका जिंकली. तब्बल 22 वर्षांनंतर लंकेमध्ये भारतीय संघाने कसोटी मालिका पहिल्यांदा जिंकली होती. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, विंडीज, लंका, दक्षिण आफ्रिका विरूद्ध कसोटी मालिका जिंकल्या. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018 साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर भारताने विंडीजविरूद्धची मालिका जिंकून आयसीसीच्या कसोटी मानांकनात अग्रस्थान पटकाविले. भारतीय संघाने आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. धोनी दुसऱया तर गांगुली तिसऱया क्रमांकावरील यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या कर्णधारांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ पहिल्या, ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटींग दुसऱया, स्टिव्ह वॉ तिसऱया आणि कोहली चौथ्या स्थानावर आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही कोहलीच्या कामगिरीचे खास कौतुक केले आहे.