प्रतिनिधी/ पणजी
गृहविलगीकरणातील कोरोनाबाधितांसाठी शिवसेनेने अनोखी मदतसेवा सुरू केली आहे. त्याद्वारे त्यांना लागणारे गरजेचे सामान घरपोच देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी दिली आहे.
पणजी मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सचिव चेतन पेडणेकर आणि फोंडा तालुका प्रमुख अंबेश वेरेकर उपस्थित होते. राज्यात अशी अनेक कुटुंबे गृहविलगीकरणात आहेत ज्यांना एखादी जीवनावश्यक वस्तू हवी असल्यास ती आणून देण्यासाठी अन्य कोणताही आधार नसतो. पती-पत्नी दोघेच राहात असतील आणि दोघेही बाधित असतील तर अधिकच पंचाईत होते. अशा लोकांना मदत करण्यासाठीही कुणी पुढे येत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने त्यांच्यातीलच एखाद्यास सामान किंवा औषधे आणण्यासाठी स्वतःच दुकान किंवा फार्मासीत जावे लागते. अशा प्रकारातून कोरोना संसर्ग अधिक पसरण्याचा धोका असतो, असे कामत यांनी सांगितले.
अशा लोकांसाठी जीवनावश्यक साहित्य घरपोच देण्यासंबंधी सरकारने व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे अनेकदा करण्यात आली होती. परंतु विद्यमान सरकार विरोधकांचे किंवा अन्य कुणाचेच सांगणे/म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. या सरकारने केवळ मनमानी कारभार चालविला आहे. अशा प्रकारांमुळेच राज्यात रोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे आणि त्याला विद्यमान सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे, असा आरोप कामत यांनी केला.
अशावेळी सरकार ऐकतच नाही म्हटल्यावर शिवसेनेने स्वतःच पुढाकार घेत अशा गरजुंना मदत करण्याचे ठरविले व त्यातून शिवसेनेतर्फे ’कोविड सेना’ स्थापन करण्यात आली. राज्याच्या विविध भागात या सेनेचे कार्यकर्ते लोकसेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या एखाद्या व्यक्तीने फोन केल्यास सेनेचे कार्यकर्ते त्यांना हवे असलेले सामान घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करणार आहेत. सदर जीवनावश्यक सामान गरजेचे असले तरीही ’अत्यावश्यक नाही’ असेच असावे. संबंधित व्यक्तीने ऑनलाईन किंवा अन्य व्यवस्थेतून ते स्वतः खरेदी केलेले असावे. असे सामान सेनेचे कार्यकर्ते त्याच्या घरापर्यंत आणून देणार आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत असेल, असे कामत यांनी सांगितले.
या सेवेसाठी प्रशांत आरोलकर व दिवाकर जाधव (पेडणे), बाबली नाईक (मांद्रे), झायगल लोबो (म्हापसा), ऐश्वर्या साळगावकर (शिवोली), चेतन पेडणेकर व अंबेश वेरेकर (डिचोली), विश्राम परब व सखाराम गावस (सांखळी), रिया पाटील (पर्वरी), राजेश पाटील (रायबंदर/जुने गोवे), सुर्यकांत प्रियोळकर (मडगाव), संजय देसाई (केपे), दीपक येरम व राजाराम पाटील (मुरगाव), रवळनाथ चोडणकर (झुवारीनगर), सुशांत पावसकर (उत्तर जिल्हा संपर्क) हे कार्यकर्ते वावरणार आहेत. अधिक माहितीसाठी राज्यप्रमुख जितेश कामत (9545158989) किंवा मिलिंद नाईक (9764649692) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.