बेळगाव / प्रतिनिधी
शासनाने 2016 पासून 4 जी सेवा पुरविण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना सुविधा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तातडीने 4 जी सुविधा पुरवावी, कंत्राटी कर्मचाऱयांचे वेतन वाढविण्याबरोबर त्यांना कामावरून कमी करू नये, बीएसएनएल कर्मचाऱयांना तिसरा वेतन आयोग लागू करावा, नवीन भरती झालेल्या कर्मचाऱयांना निवृत्ती वेतन लागू करावे, आदी मागण्यांसाठी गुरुवारी बीएसएनएलच्या कर्मचाऱयांनी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
4 जी सेवा देण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने ग्राहकांना सुविधा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. 4 जीकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. इतर खासगी कंपन्या 4 जी सेवा पुरवितात. मात्र बीएसएनएल 4 जी सेवा पुरवू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी क्यक्त होत आहे. त्यामुळे 4 जी सेवा पुरवावी. बीएसएनएलचा विकास साधण्यासाठी 69 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्याप कोणताच विकास साधण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे बीएसएनएलच्या केबल व इतर साहित्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे निधी उपलब्ध करून द्यावा, कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या कर्मचाऱयांना वेळेत वेतन मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना वेळेत वेतन मंजूर करावे, यासह इतर कर्मचाऱयांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी संघटनांच्यावतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष वाय. आर. हंसीमनी, सचिव अरविंद कौलगे, के. बी. घाटगे, डी. एम. कांबळे, एन. एल. भोसले, डी. एस. सांबरेकर, सी. आर. पाटील, जोसेफ बारदेस्कर यासह कर्मचारी उपस्थित होते.