प्रतिनिधी/ बेळगाव
धावपळीचे जीवन, बदलती जीवनशैली, अतिताण यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळेच मधुमेहाचे प्रमाणही वाढत असून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे, असे मत केएलई संस्थेचे संचालक बी. आर. पाटील यांनी व्यक्त केले. जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने चिकोडी केएलईमध्ये आयोजित मधुमेह शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
मधुमेहींच्या संख्येत भारत जगात दुसऱया क्रमांकावर असून दक्षिण भारतात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, ही काळजी करण्याजोगी बाब आहे. यासाठी नियमित तपासणी, मानसिक स्थैर्य व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज पोळ यांनी आजारापासून मुक्तता हवी असेल किंवा त्यांचे प्रमाण कमी व्हायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्यायाम हा अनेक रोगांवर महत्त्वाचा इलाज ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत पुजारी, डॉ. राणी गाली, डॉ. परमानंद होसपीटी, डॉ. प्रभावती मुगळखोड, डॉ. अरविंद मिनचे आदी यावेळी उपस्थित होते. महांतेश गुड्डवर यांनी स्वागत केले. शिबिरात 60 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.