प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप : पालकांना कोरोनाच्या फैलावाची धास्ती
प्रतिनिधी / मडगाव
लॉकडाऊनमुळे कित्येक गोमंतकीय जहाजांवर आणि परदेशात तसेच देशातील अन्य राज्यांत अडकून पडले आहेत. त्यात शिक्षण घेण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश असून त्यांना परत आणण्यासाठी पालकांचा आटापिटा सुरू असला, तरी प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
विदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू होण्याची आवश्यकता असते. मात्र देशांतर्गत जवळच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतून आपल्या मुलांना गोव्यात आणणे शक्मय होत नसल्याच्या पालकांच्या वाढत्या कैफियती येऊ लागल्या आहेत. आपली मुलगी शिक्षणासाठी महाराष्ट्रात गेलेली असून वरळी येथील एका घरात आपल्या मैत्रिणींसह पेईंग गेस्ट म्हणून ती राहत आहे. आपणास गोव्यात घेऊन जावे अशी विनंती ती आपल्याला करत आहे. मात्र तिला आणण्यासाठी वाहन घेऊन जाण्यास प्रशासनाकडून मान्यता मिळत नसल्याने आपण अगदीच अडचणीत आलो आहोत, अशी प्रतिक्रिया मडगाव पालिकेचे माजी नगरसेवक राजू नाईक यांनी व्यक्त केली.
अनेक दिवसांपासून केलेले प्रयत्न फोल ः नाईक
मागील कित्येक दिवसांपासून आपण आवश्यक प्रशासकीय सोपस्कार करत आहे. मात्र हिरवा कंदील मिळत नसल्याचे नाईक यांनी नजरेस आणून दिले. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांकडे दोन वेळा आपण ई-अर्ज केला. मुलीला वरळी-मुंबई येथून आणण्यासाठी परवानगी देण्याची मागणी त्यात करण्यात आली होती. दोन्ही वेळा ती जिल्हाधिकाऱयांनी फेटाळली. आपण स्थानिक आमदार विजय सरदेसाई, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर तसेच विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत यांच्या भेटी घेऊन त्यांच्यामार्फत प्रशासकीय अधिकाऱयांशी संपर्क साधून परवानगी मिळविण्यासाठी केलेले प्रयत्नही फोल ठरल्याचे त्यांनी सांगितले.
आपण वरळी-मुंबईतील प्रशासकीय अधिकाऱयांशी संपर्क साधून पाहिला असता गोव्यातून आवश्यक परवानगी घ्यावी, तर आम्ही देऊ असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना व्हॉट्सऍपवर आपण संदेश पाठवून दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था करावी
आम्हाला वाहन घेऊन जाऊ दिले जात नाही. त्यामुळे सरकारने स्वतःहून अन्य राज्यांत अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जहाजांवर अडकलेल्या खलाशांना आणण्यासाठी सरकार ज्या प्रकारे तत्परता दाखवत आहे ती योग्य आहे. मात्र अशीच तत्परता देशांतर्गत अन्य राज्यांत अडकून पडलेल्या विद्यार्थ्य्यांबद्दल का दाखविली जात नाही, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. आपल्या मुलीचे वास्तव्य असलेल्या वरळी भागात कोरोनाचा फैलाव झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबईखेरीज पुणे, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेंगलुरू, बेळगाव व अन्य राज्यांत गोव्याचे विद्यार्थी अडकून पडले असून त्यांची व त्यांच्या पालकांची मनस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सरकार?ने अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना गोव्यात आणण्यास प्राधान्य देण्याची मागणी पालकांतर्फे उचलून धरण्यात येत आहे.