नियमांचा जनतेला जाच होऊ नये : डॉ. केतन भाटीकर यांचा आरोप
प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर आवश्यक आहे. मात्र दुचाकी व चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱया सर्वसामान्य जनतेला सोशियल डिस्टसिंगच्या नावाखाली जो दंड ठोठावला जात आहे, ती एक प्रकारची सतावणूक असल्याचा आरोप मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केला आहे. फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. भाटीकर बोलत होते. यावेळी मगो पक्षाचे फोंडा गटाध्यक्ष अनिल नाईक हे उपस्थित होते.
सरकारने कुठलेही नियम करताना त्याचा सारासार विचार करून जनतेला नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. सोशियल डिस्टसिंगच्या नावाखाली सर्व सामान्य नागरिक व आमदारांना वेगळा कायदा आहे काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काही आमदार गरीबांना धान्य वाटण्याच्या नावाखाली गर्दी जमवून सामाजिक अंतराच्या नियमाचे धिंडवडे उडवत आहेत. अशा लोकांवर कोण कारवाई करणार, असे सांगून सनग्रेस गार्डन बेतोडा येथे घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला. गरीबांना धान्य वाटपाच्या नावाखाली हे लोक आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचेही डॉ. भाटीकर म्हणाले.
लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱया व व्यवसाय अडचणीत आले असून त्यामध्ये टॅक्सी चालक, मोटरसायकल पायलट, रिक्षा चालक तसेच इतर असंघटीत क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे. सरकारने त्यांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी डॉ. भाटीकर यांनी केली.
सरकार व सेवादुतांचे अभिनंदन
गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन ज्या उपाय योजना आखल्या त्याबद्दल डॉ. भाटीकर यांनी सरकारचे अभिनंदन केले. तसेच या काळात जनतेला सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता व आरोग्य कर्मचारी तसेच इतर सर्व सरकारी कर्मचाऱयांच्या सेवेची त्यांनी प्रशंसा केली. गोवा कोरोनामुक्त झाले असले तरी अजून काही काळ आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. राज्याच्या सीमा भागातील चेकनाक्यांवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची व वाहनांची कसून तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
आपत्कालीन मदत वाहिनी सज्ज
अवकाळी पाऊस व वादळी वाऱयामुळे होणारी पडझड तसेच पावसाळय़ात येणारा पूर व इतर आपत्कालीन घटनाच्यावेळी जनतेच्या मदतीसाठी फोंडय़ात सुरु असलेली मदत वाहिनी पुन्हा सक्रीय केल्याची माहिती त्यांनी दिली. फोंडय़ातील जनतेसाठी चोवीस तास ही मदत वाहिनी उपलब्ध असेल. पावसाळय़ात वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही याची वीज खात्याने खबरदारी घ्यावी तसेच वीज खात्याच्या कर्मचाऱयांना आवश्यक उपकरणे व त्यांच्या सुरक्षेसाठी उपकरणे पुरविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपत्कालीन घटनांच्यावेळी मदतीसाठी धावणारी अग्नीशामक दलाची वाहने सुस्थितीत असतील व त्यांच्याकडे पुरेशी साधने असतील याकडे लक्ष घालण्याची मागणीही डॉ. भाटीकर यांनी केली. आपत्कालीन मदतीसाठी 9158999363 किंवा 8605710544 या क्रमांकावर मदत वाहिनीशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. भाटीकर यांनी केले आहे.