ऑनलाईन टीम / पुणे :
कृषिपंपाच्या अनेक वर्षांच्या थकीत वीजबिलांतून मुक्तता झाल्याच्या आनंदासह वीजबिलांच्या भरण्यातून गाव व जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावल्याचे मोठे समाधान आहे. थकबाकीमध्ये 66 टक्के सूट, मागेल त्यांना कृषिपंपांची नवीन वीजजोडणी, सौर ऊर्जेद्वारे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा या तरतुदी खरोखरच कृषिक्षेत्रातील नवे पर्व निर्माण करणाऱ्या आहेत’ असे प्रातिनिधीक मनोगत हवेली, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणकडून आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
येथील ‘प्रकाशभवन’मध्ये ऊर्जा विभागाच्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’ला पुणे परिमंडलात सुरवात करण्यात आली. कोविड-19चे नियम पाळून आयोजित या कार्यक्रमात प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, श्री. शंकर तायडे, महाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण यांच्यासह जुन्नर व हवेली तालुक्यातील प्रातिनिधीक लाभार्थी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.कृषिपंपांच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त झालेले श्यामराव गणपत गायकवाड, लक्ष्मण दगडू गायकवाड, लिलाबाई अरुण घुले, केरबा दगडू गायकवाड, वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे (मुळशी विभाग) तसेच कृषिपंपांची नवीन वीजजोडणी मिळालेले जिजाबाई साधू येवले, बाळासाहेब विठ्ठल जगताप, नितीन मुरलीधर काजळे, पूजा संभाजी बुट्टे (मंचर विभाग) यांचा महावितरणच्या वतीने सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांनी लोकाभिमुख कृषी ऊर्जा धोरणाचा लाभ इतरांपर्यंत पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने कृषिक्षेत्रासाठी प्रथमच व स्वतंत्र ऊर्जा धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीमुक्तीसह पाहिजे तेव्हा नवीन वीजजोडणी तसेच बिल भरलेल्या रकमेतील 66 टक्के हक्काच्या निधीतून गाव, जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. या ऐतिहासिक धोरणाचा व संधीचा सर्व शेतकऱ्यांनी जरुर फायदा घ्यावा.
त्याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ‘कृषी ऊर्जा पर्व’ सुरु करण्यात आले आहे असे प्रतिपादन प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले.