तीस टक्के वीज भरण्यास व्यापारी तयार
प्रतिनिधी/ सातारा
वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ व्यापाऱयांनी बुधवारी साताऱयात शटर बंद आंदोलन करत वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. जे व्यापारी वीज बिलाची 30 टक्के रक्कम भरण्यास तयार आहेत. ती भरून घेऊन त्यांना काही कालावधी द्यावा, अन्यथा वीज वितरण कंपनीला नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागेल, असा इशाराही सातारा शहरातील व्यापाऱयांनी यावेळी दिला.
राजपथावरील व्यापाऱयांनी शटर डाऊन करुन महावितरण कपंनीचा निषेध नोदंवला. या आंदोलनात अनंत ट्रेडिंग कंपनीचे सागर भोसले, कॉटनकिंग, गोविंद पान शॉप आदीचे व्यावसायिक सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी 6 वाजता अचानकपणे महावितरण कपंनीच्या कर्मचाऱयांनी येवून उद्योजकांचे वीज कनेक्शन तोडली. त्यामुळे अंधार निर्माण झाला आहे. जे ग्राहक, व्यापारी, उद्योजक वीज बिल भरत नाहीत त्यांचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम कंपनीने हाती घेतले आहे. सातारा शहरातील ज्या व्यापाऱयांनी विज बिल भरले नाही, त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आल्यामुळे व्यापाऱयांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आज दुपारी काही व्यापाऱयांनी एकत्रित येत वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात शटर बंद आंदोलन केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना अनंत ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख सागर भोसले म्हणाले, सातारा शहरातील बऱयाच व्यापाऱयांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. यापूर्वीच आम्ही 30 टक्के वीज बिल भरण्यास तयार असून उर्वरित बिलासाठी काही कालावधी द्यावा, अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे एका पत्राद्वारे केली होती. मात्र आमची मागणी फेटाळून लावत वीज कनेक्शन कट करण्यात आल्यामुळे विद्युत कंपनीच्या निषेधार्थ आम्ही शटर बंद आंदोलन करीत आहोत.
सागर भोसले म्हणाले, महावितरण कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे. आधीच लॉकडाउनमुळे व्यापाऱयांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बिल कनेक्शन कट करून विज वितरण कंपनीने व्यापाऱयांवर अन्याय केला असून वीज बिलाची 30 टक्के रक्कम भरून घेऊन उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्यांना काही कालावधी द्यावा, महावितरणचा मनमानी कारभाराला लगाम लागला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.