स्मार्ट सिटीच्या कामाचा नागरिकांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील जलवाहिन्यांना दररोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी गळती लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी सकाळी वीरभद्रनगर येथील जलवाहिनीला गळती लागल्याने कारंज्याचे स्वरूप आले होते. परिणामी गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले.
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. मात्र सध्या ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई करताना जलवाहिन्यांचे नुकसान झाल्याने गळती लागत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. शिवाजीनगर, वीरभद्रनगर परिसराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला रविवारी गळती लागली. अचानक लागलेल्या गळतीमुळे पाण्याचे फवारे उडू लागले. नागरिकांनी पाहणी केली असता जलवाहिनीचे नुकसान झाल्यामुळे पाण्याचे फवारे उडत असल्याचे आढळले. गळतीनंतर दीड-दोन तास पाण्याचे फवारे उडतच होते.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तीन वर्षांपासून काम सुरू आहे. अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळेच जलवाहिन्या व गॅसवाहिनीला गळती लागण्याचा प्रकार घडत आहे. अचानक गळतीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
अधिकाऱयांनी कार्यवाही करावी : मुबारक सनदी
स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे. सातत्याने खोदाई करण्यात आल्याने पाणी गळती होत आहे. रविवारी सकाळी अचानक पाण्याचे फवारे उडू लागले. वीरभद्रनगरला पुरेल इतके पाणी गळतीद्वारे वाया गेले. अधिकाऱयांना संपर्क साधून माहिती दिल्यानंतर पाणीपुरवठा बंद झाला. पण या ठिकाणी खोदाई करण्यात आल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी आणि लोकप्रतिनिधींनी वीरभद्रनगर परिसरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली.