पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना : विविध विषयांवर अधिकाऱयांची बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
गेली चाळीस वर्षे जुना असलेला कल्लोळ, ता. चिकोडी येथील बॅरेजची नव्याने उभारणी करण्यासाठी 35 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्या, अशी सूचना उपमुख्यमंत्री व बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांना केली.
रविवारी सरकारी विश्रामधाम येथे जलजीवन मिशन, बहुग्राम पिण्याचे पाणी योजना, कोरोना नियंत्रण आदी विषयांवर त्यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, 1980 मध्ये 0.60 टीएमसी क्षमतेचे कल्लोळ बॅरेज उभारण्यात आले आहे. हे बॅरेज 40 वर्षे जुने आहे. त्यामुळे त्यामध्ये अपेक्षित पाणीसाठा होत नाही. म्हणून नव्या बॅरेजची उभारणी करण्याची गरज आहे, असे पाटबंधारे विभागाचे अभियंते सी. डी. पाटील यांनी सांगितले.
या विषयावर उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताच तातडीने अप्पर मुख्य सचिवांशी बोलून 35 कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची सूचना त्यांनी केली. कल्लोळ बॅरेजच्या निर्मितीमुळे राजापूर व काळम्मावाडी बॅरेजमधून येणारे पाणी साठविण्यासाठी मदत होणार आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्या तरी पुराचा धोका नाही, असे बैठकीत सांगण्यात आले.
जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र सरकारने अनुदान दिले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सर्व तयारी पूर्ण करून त्यानंतर या योजनेला चालना द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना केली. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्व गावांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याची योजना आहे. जिल्हय़ातील 8 लाख 52 हजार घरांना नळपाणी पुरविण्यासाठी केंद्र सरकारने 2100 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 918 लोकवस्त्यांना पूर्ण प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत कामाला सुरुवात करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
नव्या कूपनलिका खोदण्याऐवजी आहे त्या दुरुस्त कराव्यात. त्यामधून पाण्याचे पुनर्भरण करण्यात यावे. जलजीवन मिशन योजनेसाठी नद्यांच्या पाण्याचा वापर करावा. पाणी योजनेला सुरुवात झाल्यानंतर विजेचे बिल कोण भरणार, असा गोंधळ निर्माण होतो. याकडेही अधिकाऱयांनी लक्ष द्यावे, असे सांगतानाच मुरगोड पाणीपुरवठा योजनेला एक्स्प्रेस फिडरच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यास विलंब झाल्यामुळे हेस्कॉमच्या अधिकाऱयांचा त्यांनी समाचार घेतला.
यावेळी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिश्वास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, डॉ. आय. पी. गडाद आदी उपस्थित होते.
चिकोडी येथे लवकरच प्रयोगशाळा चिकोडी येथे आरटीपीसीआर तपासणीसाठी लवकरच प्रयोगशाळा सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक तज्ञ व कर्मचाऱयांची नियुक्ती राज्यपातळीवरूनच केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी बैठकीत दिली. तिसऱया लाटेत लहान मुलांना मोठय़ा प्रमाणात बाधा होणार आहे. त्यामुळे या मुलांच्या मातांनाही प्राधान्यक्रमाने लस देण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.