प्रतिनिधी / मणेराजुरी
मणेराजूरीचे वीर सुपूत्र ‘ महावीर चक्र विजेते ‘ पांडूरंग साळुंखे यांच्या हौतात्म्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १६ मराठा एन .सी.सी. महाराष्ट्र बटालियन मार्फत विशेष सन्मान अभिवादन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्र व देशभर शहीद व महावीर चक्र विजेत्यांचा गौरव सन्मान भावी पिढीला प्रेरणा देणेसाठी देशप्रती आदर निमार्ण व्हावा ; यासाठी संपूर्ण देशभर या कार्यक्रमांचे ऑनलाईन प्रक्षेपण सुरू होते ; या अभिवादन सोहळयासाठी; कर्नल पी . सी. पवार ;एस .के. बाबू कमांडींग ऑफीसर ; लेफ्ट कर्नल एस .एम. कुलकर्णी ; सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी ; तिरुपती माळकर ; पोलीस निरीक्षक नितीन केराम सरपंच सदाशिव कलढाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या वीरमरणाला २०२१ला ५० वर्ष पूर्ण होत असून सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु आहे.
१९७१ च्या बांगलादेशमुक्ती युद्धात मणेराजूरीचे सुपूत्र व १५ मराठा लाईफ इंन्फंट्रीचे जवान पांडूरंग साळुंखे यांनी मोठा पराक्रम करुन पाकिस्तानला धूळ चारली होती. ६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना वीरमरण आले होते.
या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर ‘ महावीर चक्र ‘ प्रदान करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या वीर सुपुत्राच्या कुटूंबाचा गौरवण्यात आले होते. मणेराजूरीत त्यांचा अर्धपुतळा असून, त्यांच्या नावे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजही चालविले जाते. बेळगांव येथेही त्यांच्या स्मृती जपल्या जातात. या भव्य कार्यक्रमाची गेली तीन दिवस रंगीत तालीम सुरू होती. यावेळी एन.सी.सी. च्या जवानांनी त्यांना सलामी दिली. गावातील हायस्कूलच्या विदयार्थीनीनी या वीराची यशोगाथा सर्वांच्या समोर मांडली. या विशेष कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. यासाठी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.