पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत : पर्यटक, शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय : पालकमंत्र्यांनी सुविधांसाठी निधी द्यावा! :नागरिकांची मागणी
भरत सातोस्कर / वेंगुर्ले:
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा होऊन सुमारे 25 वर्षे उलटली, तरी पर्यटन जिल्हय़ातील बीचसह पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सेवासुविधा पूर्णत्वास आल्या नाहीत. त्यामुळे नावापुरता पर्यटन जिल्हा की काय? असा सवाल पर्यटन व्यावसायिक व जनतेतून व्यक्त होत आहे. वेंगुर्ले नगर परिषद क्षेत्रातील निमुसगा ते लाईटहाऊस या सुमारे दीड कि.मी. रस्त्याकडे गेली 25 वर्षे दुर्लक्ष झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या गावातील हा एकमेव रस्ता मातीचा असल्यामुळे दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वेंगुर्ले नगर परिषद हद्दीतील लाईटहाऊस हे पर्यटनदृष्टय़ा महत्वपूर्ण आहे. या लाईटहाऊसच्या सिग्नलवर त्यावेळी प्रवासी बोटी, मालवाहू जहाज वेंगुर्ले बंदारात येत असत. आजही मच्छीमारांना तसेच बाहेरच्या बोटींना या लाईट हाऊसमुळे खडकाळ भागाची कल्पना येते. या लाईट हाऊससाठी विशिष्ट प्रकारचे 3000 वॅटचे बल्ब जे आज बाजारात उपलब्ध नाहीत. मात्र, त्यावेळी मोठय़ा प्रमाणात खरेदी करून ठेवलेल्या बल्बचा वापर केला जात आहे. वेंगुर्ले बंदरावरून उंच टेकडीवर समुद्रानजीक बांधण्यात आलेल्या या लाईटहाऊसचे महत्व ऐतिहासिकदृष्टय़ा महत्वाचे आहे. कारण ब्रिटीश काळात शत्रूपासून सुरक्षेच्यादृष्टीने वसाहत सोडून बांधलेल्या भागात येण्या-जाण्यासाठी रस्ताही डेंगराळ व कच्चा ठेवून त्याकडे फक्त याच डिपार्टमेंटमधील व्यक्ती जाऊ शकतील. तसेच लष्करांना येण्या-जाण्यासाठी निमुसगा येथून कच्चा रस्ता ठेवण्यात आला होता. या केंद्र सरकारच्या विशेष खात्याकडे येण्या-जाण्याचा दोन कि.मी.चा मार्ग डांबरीकरण झाल्यास पर्यटन स्थळास अधिक महत्व येईल.
शालेय सहली, पर्यटकांची वर्दळ
लाईटहाऊस या पर्यटन स्थळाबाबतच्या हिस्ट्रीमुळे अनेकांच्या वाचनात येत असल्याने या भागतील ही वास्तू पहाण्यास देशी-विदेशी पर्यटक, कृषी विद्यापिठाचे प्राध्यापक व शास्त्रज्ञ, विद्यार्थी सहली, इतिहासाचे अभ्यासक पाहण्यासाठी येतात. पण या ठिकाणाकडे जाणारा रस्ता हा कच्चा व मातीचा असल्याने हे पर्यटन स्थळ पहाण्यास येणाऱया पर्यटकांना प्रवासाचा त्रास होतो. सदरचा रस्ता होण्यासाठी नगरपरीषदेकडे मागणी करून तो करण्याची टाळाटाळ होत आहे.
एकमेव कच्चा, लालमातीचा रस्ता
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या गावातील लाईटहाऊस या पर्यटन स्थळाकडे जाणारा निमुसगा ते लाईटहाऊस हा दीड कि.मी.चा एकमेव रस्ता मातीचा असून सदर रस्ता पर्यटनस्थळ असल्याने ते प्राधान्याने करून घेणार काय? असा सवाल वेंगुर्लेवासीय जनतेतून होत आहे. या लाईटहाऊसवर केंद्रशासनाचे कर्मचारी काम करतात. त्यांना येण्याजाण्यासाठी सरळ रस्ता हा कच्चा व खराब असल्याने त्यांनीही त्रास होतो. तसेच या डोंगराळ भागातील गवतास आकस्मिक आग लागण्याच्या घटना उन्हाळय़ात घडतात. त्यावेळी अग्निशमनची गाडी जाताना गैरसोय होते.
प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!
लाईटहाऊस हे पर्यटन ठिकाण असल्याने तसेच सूर्यास्त दर्शन, स्वच्छ हवेची ठिकाण, समुद्राचे, समुद्र किनाऱयाचे तसेच मासेमारी करणाऱया होडय़ा व ट्रॉलर्स त्याचप्रमाण तालुक्याच्या भागातील रेडी ते निवतीपर्यंतच्या भागातील समुद्र यांचे विहंगमदृष्य तेथून दिसत असल्याने अनेक नागरिक चालत या भागात जाऊन त्याचा लाभ घेतात. तर काही लोक स्वच्छ हवेसाठी मार्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी या भागात रोज जा-येत असतात. या लाईटहाऊस नजीकच्या भागात पर्यटनदृष्टय़ा ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था अशाप्रकारे नियोजन करून तो भाग नगर परिषदेने विकसित केल्यास गोवा राज्याप्रमाणे या भागात पर्यटन वाढेल. मात्र, नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
सिंधुदुर्गच्या पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या सरकारमधील शिवसेनेचे युवा नेते तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह या पर्यटन स्थळास भेट देऊन येथील गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.