देशात 10 ते 17 वर्षे वयोगटातील 1 कोटी 58 लाख मुलांना विविध प्रकारचे व्यसन असल्याची केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली माहिती आणि विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये 40 जणांचा झालेला मृत्यू यामुळे व्यसन व व्यसनाधिनतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे पहायला मिळते. स्वाभाविकच भविष्यात भारतासारख्या देशापुढे वाढती व्यसनाधिनता हेही मोठे आव्हान असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सरकारमार्फत देशातील अमली पदार्थांच्या वापराची व्याप्ती आणि अमली पदार्थांच्या प्रकाराच्या वापराची माहिती घेण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील निष्कर्ष व आकडेवारी धक्कादायकच म्हणावी लागेल.
भारतात सद्यस्थितीत युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. व्यसनामुळे मोठय़ा प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होईल याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्मय होत नाही. कोणतीही व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी मद्यसेवन करत नाही. काल्पनिक अथवा वास्तवातील प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी दारू किंवा अमली पदार्थाचा वापर केला जातो. पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत अशा काही कारणांमुळे व्यसनाधीनता जडताना दिसते. एकदा व्यसन जडले की ते सुटणे अवघड असते. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर दारू सुटू शकत नाही. त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य औषधोपचारांची साथ लागतेच. मात्र, व्यसनाच्या विनाशकारी जाळय़ामध्ये अडकलेल्या युवा पिढीला वाचविण्याचे आव्हान आपल्या यंत्रणांसमोर आहे.
अल्कोहोल सर्वाधिक वापरला जाणारा घटक
या अहवालातील निष्कर्षांनुसार, अल्कोहोल हा सर्वाधिक वापरण्यात येणारा घटक ठरला आहे. नशा करण्यासाठी भारतीय तरुण सामान्यपणे अल्कोहोल म्हणजेच मद्याचा सर्वाधिक वापर करीत असल्याचे दिसून येते. 10 ते 75 वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी 14.6 टक्के नागरिक मद्यसेवन करतात. म्हणजेच मद्यप्राशन करणाऱयांची संख्या 16 कोटी इतकी आहे. यातील पाच कोटी सात लाखांहून अधिक व्यक्ती अल्कोहोलच्या आहारी गेल्या आहेत. 30 टक्के नागरिक देशी दारूचे, तर 30 टक्के नागरिक भारतीय बनावटीच्या परदेशी मद्याचे सेवन करतात. तर महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये हे प्रमाण 1.6 टक्के, तर पुरुषांमध्ये 27.3 टक्के इतके असल्याचे सांगण्यात येते. एकूण मद्यसेवन करणाऱयांची संख्या मोठी आहे.
कौटुंबिक स्वास्थ्यावरही परिणाम
अल्कोहोलचे मानवी शरीरामधील अनेक अवयवांवर दुष्परिणाम होत असतात. त्याचबरोबर आरोग्यविषयक गुंतागुंतीच्या समस्याही निर्माण होतात. हे पाहता व्यसनाधिनतेमध्ये मद्यप्राशन ही प्रमुख समस्या ठरते. याचा केवळ संबंधित व्यक्तीवर नव्हे, तर त्यांच्या कुटुंबावरही विपरित परिणाम होत असतो. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. ताणतणावात वाढ होते.
छत्तीसगड, पंजाब, गोव्यात सर्वाधिक मद्यप्राशन
राज्यनिहाय विचार केला, तर छत्तीसगड, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वाधिक मद्यप्राशन केले जाते. बिहार आणि गुजरात ही दारूबंदी असलेली भारतातील दोन मोठी राज्ये आहेत. तर नागालँड, मिझोराम या राज्यांमध्ये काही अपवाद वगळता दारूबंदी लागू आहे. केरळ, हरियाणातही दारूबंदी लागू करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. किंबहुना अंमलबजावणी करणे अवघड बनल्याने तेथील दारूबंदी उठविण्यात आली होती.
दारूबंदीनंतरही बळी
बिहार आणि गुजरात या राज्यांमध्ये दारूबंदी असली, तरी तेथे दारू मिळत नाही, असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल. या राज्यांमध्ये चोरटय़ा मार्गाने दारूचे वितरण, पुरवठय़ाची साखळी निर्विघ्नपणे सुरू असल्याचे पहायला मिळते. नुकतीच घडलेली बिहारमधील दारूबळीची घटना यावर झगझगीत प्रकाशच टाकते. या राज्यात विषारी दारूचे सेवन केल्यामुळे तब्बल 65 हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे तिची अधिक कडक अंमलबजावणी करण्यावर आगामी काळात या राज्यांना भर द्यावा लागेल.
अमली पदार्थांची झिंग
अमली पदार्थांचे व्यसनही दिवसागणिक वाढत आहे. तरुणांमधील याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात दिसून येते. तीन कोटी एक लाख व्यक्ती गांजा किंवा त्यापासून बनविलेल्या अमली पदार्थांचे व्यसन करतात. त्यापैकी 25 लाख व्यक्तींच्या प्रकृतीवर व्यसनाधिनतेचे परिणाम होत आहेत. तर 2 कोटी 26 लाख नागरिक अफूचे सेवन करतात. त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्यांमुळे 77 लाख लोकांना वैद्यकीय मदतीची गरज भासत असल्याकडेही हा अहवाल लक्ष वेधतो.
भारतात 12 कोटींवर स्मोकर
भारतासारख्या देशात 12 कोटींहून अधिक लोकांना धुम्रपानाचे व्यसन जडले असून, या कारणामुळे 13 लाखांहून अधिक जणांचा दरवर्षी मृत्यू होत असल्याचे आकडेवारी सांगते. तर जगात 80 लाख लोकांचा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यातून सिगारेटचे व्यसन किती जीवघेणे आहे, हेच अधोरेखित होते. न्यूझीलंडमध्ये स्मोकिंगचे प्रमाण 8 टक्के असून, ते पुढच्या तीन वर्षांत पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट या देशाकडून ठेवण्यात आले आहे. कर्करोग, हृदयरोग, पक्षाघातासारख्या गंभीर आजारांचा धोका पाहता भारतालाही हा विषय गांभीर्याने हाताळावा लागेल.
न्यूझीलंडमध्ये ‘सिगारेट’ निर्बंधासाठी कायदा
व्यसनाधिनता ही जगातील प्रत्येक देशाची समस्या बनली आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा देशात यावर कशा पद्धतीने निर्बंध घालण्यात येतील, यासाठी प्रयत्न सुरू असतात. न्यूझीलंडमध्ये 14 वर्षांखालील मुला-मुलींना सिगारेट विकत घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशी बंदी घालणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. नवीन वर्षात ही बंदी लागू होणार आहे. याखेरीज 50 वर्षांवरील व्यक्तींनाही तंबाखूजन्य पदार्थ उलपब्ध होणार नाहीत. त्यासाठी काही बंधने घालण्यात आली असून, अशी विक्री करणाऱयांना 1.42 लाख डॉलरचा दंड केला जाणार आहे.
जो पियेगा, वो मरेगा ः नितीशकुमार
बिहारमधील दारूबळीच्या घटनेनंतर देशात या विषयावर मोठय़ा प्रमाणात घुसळण सुरू असून, लोकसभेत भाजपा खासदारांनी बिहार सरकारवर कारवाईची मागणी केली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जो पियेगा, वो मरेगा, असे सांगत विषारी दारू पिणाऱयांना मृत्यूपासून रोखणे कठीण असल्याचे म्हटले आहे. दारूबंदी होण्यापूर्वीही बळी जात होते. बंदीनंतर महिलांच्या मारहाणीच्या घटना, रस्ते अपघात, यात घट झाली असून, जेवणाच्या ताटातील भाज्या, दूध, डाळींचे प्रमाण वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
व्यसनामुळे मुलास गमावले ः केंद्रीय मंत्र्याची भावना
माझ्या मुलाचा जीव व्यसनामुळे गेला. मी खासदार व पत्नी आमदार असूनही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही. या कारणासाठी कोणत्याही पालकांना आपले मूल गमवावे लागू नये, अशी भावना अलीकडेच एका केंद्रीय मंत्र्याने व्यक्त केली आहे. देशासमोरील हा सर्वांत मोठा चिंतेचा विषय असून, अमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या भावना व तळमळ पालक म्हणून नक्कीच समजून घेण्यासारखी आहे.
जनजागरण, प्रबोधनाचीही गरज
एकूणच मद्यपान, धुम्रपान, गुटखा, अमली पदार्थांचे सेवन याच्या जाळय़ात आजची पिढी मोठय़ा प्रमाणात अडकताना दिसत आहे. केंद्राच्या अहवालावरून अगदी दहाव्या, बाराव्या वर्षांपासूनच म्हणजेच कोवळय़ा वयातच या साऱयाला सुरुवात होत असल्याचे दिसून येते. ज्या वयात कोणतीही समज नसते, अशा वयातच व्यसनामुळे मुले पोखरली जात असतील, तर त्यांचे पुढचे भविष्य कसे असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अमली पदार्थ वा तत्सम व्यसनांमध्ये तरुणाईला अडकविण्यासाठी पद्धतशीरपणे जाळे कसे टाकले जाते, त्याकरिता पाटर्य़ा वगैरे कशा ऍरेंज केल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही. परंतु, या साऱयापासून कोवळय़ा मुलांसह आजच्या तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी पुढच्या काळात जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. कडक कायद्यांबरोबरच जनजागरण, प्रबोधनावर भर द्यावा लागेल. तसेच जी मुले व्यसनांच्या आहारी गेली आहेत, त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी वेगळा कार्यक्रम राबवावा लागेल. त्याकरिता मानसशास्त्रज्ञांची व वैद्यकीय तज्ञांचीही मदत घ्यावी लागेल.
कोणत्याही देशाची प्रगती त्या देशाचे, तेथील लोकांचे आरोग्य कसे आहे, यावरही जोखले जाते. देशाची तरुण पिढी निरोगी, सदृढ असेल, तरच देश सशक्त होऊ शकतो. त्यामुळे अशा निरोगी भारताकरिता वाढत्या व्यसनाधिनतेला आपल्याला पायबंद घालावा लागेल. व्यसनामुक्तीचाच मार्ग देशाला निरामय आनंदाकडे नेईल, हे नक्की.
– संकलन ः प्रशांत चव्हाण, पुणे