प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत. मात्र, मध्यवर्ती बसस्थानकासमोरील संकुलातील गाळेधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून समस्यांचे निवारण करण्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी संकुलाला पाण्याची गळती लागल्याने भाडेकरूंचे नुकसान होत असल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये महापालिकेच्या मालकीचे व्यापारी गाळे असून एकूण 440 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. यापैकी 32 गाळे मध्यवर्ती बसस्थानकासमोरील महापालिकेच्या व्यापारी गाळय़ांमध्ये आहेत. या ठिकाणी महापालिकेकडून कोणत्याच सुविधा उपलब्ध करण्यात येत नसल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहेत. पण याकडे कानाडोळा केला असल्याने संकुलामधील व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गाळेधारकांनी भाडे वेळेवर भरले नसल्यास टाळे ठोकण्याच्या कारवाईचा बडगा उगारला जातो. पण गाळेधारकांना आवश्यक सुविधा पुरविण्याकडे कानाडोळा केला जात आहे.
क्यापारी संकुलामधील छताचा गिलावा कोसळत असल्याने धोका निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी गळती लागली असल्याने पावसाळय़ात पाणी गाळय़ांमध्ये शिरून नुकसान होते. याबाबत येथील गाळेधारकांनी महापालिकेच्या अधिकाऱयांची भेट घेऊन तक्रार केली होती. पण तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील समस्या जैसे थे आहेत. या ठिकाणी विविध व्यवसायांसह हॉटेल, बँक, बेकरी, प्रशिक्षण संस्थांकरिता गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. महापालिकेची मालमत्ता असल्याने गाळय़ांची देखभाल व आवश्यक नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण महापालिका प्रशासनाने व्यावसायिकांना नागरी सुविधा पुरविण्यासह इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार व्यावसायिक करीत आहेत. इमारतीच्या दुरुस्तीबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. पण याची दखल घेण्यात आली नसल्याने महापालिकेच्या कारभाराबाबत गाळेधारक नाराजी व्यक्त करीत आहेत. वेळेवर भाडे भरूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी येथील समस्यांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.