प्रतिनिधी/ बेळगाव
खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेनुसार त्यांना वैज्ञानिक प्रशिक्षण द्या, पालकांनी आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादल्यामुळे इजा होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी मुलांना हवे ते करू द्यावे, व्यायाम करताना दर्जात्मक आणि व्यावसायिक प्रशिक्षण आवश्यक आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खेळाडूंना मार्गदर्शन करताना ‘शरीराकडे लक्ष द्या’ असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अस्थिरोगतज्ञ डॉ. अनंत जोशी यांनी दिला.
इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव यांच्यावतीने शनिवारी डॉ. अनंत जोशी यांच्याशी थेट संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. जोशी यांनी बेळगाव आणि परिसरातील खेळाडू, पालक तसेच प्रशिक्षकांशी थेट संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. यावेळी त्यांनी खेळ व सामन्यावेळी गंभीर दुखापती टाळण्यासाठी खेळाडूंनी घ्यावयाच्या खबरदारी आणि दुखापतींवर योग्य व्यायाम आणि उपचार कसा करावा, खेळाडूंनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, तसेच नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी कोणता आहार घ्यावा आणि कोणता व्यायाम करावा याची माहिती दिली. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाच्या वेणुगोपाळ सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी डॉ. जोशी यांच्यासह मुंबईच्या सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. हर्षदा राजाध्यक्ष यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. आनंद गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि विविध प्रश्नांचे निरसन करून घेतले. डॉ. अनंत जोशी यांनी प्रत्येक खेळामध्ये शरीराच्या विशिष्ट भागाला व्यायाम मिळतो. मात्र, संपूर्ण शरीराच्या व्यायामासाठी आवश्यक प्रकारचा व्यायाम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. व्यायाम करताना अन्य गोष्टींकडे लक्ष न देता एकाग्रतेने व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीराला नेमके काय होते, हे पहावे. तुमची नेहमीची स्टाईल न बदलता शरीरात विशिष्ट प्रकारचा लवचिकपणा आणि ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला डॉ. जोशी यांनी यावेळी दिला.
फिजिओथेरपिस्ट डॉ. हर्षदा राजाध्यक्ष यांनीही खेळाडूला विशिष्ट प्रकारच्या व्यायामाची आवश्यकता असल्याचे सांगितले. खेळामुळे गंभीर इजा होतात असा समज केला जातो. मात्र, आवश्यक खबरदारी घेतल्यास या गोष्टी टळू शकतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांनी डॉ. जोशी आणि डॉ. राजाध्यक्ष यांच्याशी संवाद साधून शंकांचे निरसन करून घेतले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद हलगेकर यांनी स्वागत केले आणि आयएमएच्या कार्याची माहिती दिली. रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना संयम दाखवा, अहंकार बाजूला ठेवल्यास यशस्वी व्हाल, असा सल्ला दिला. कसोटीपटू सुनील गावसकर आणि माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या बेळगाव दौऱयाची आठवणही त्यांनी सांगितली. शिरीष गोगटे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सूरज जोशी यांनी केले. प्रारंभी मोरया योगा ग्रुपवतीने नृत्य सादर करण्यात आले. रुचिरा नातू हिने स्वागतगीत गायिले.