प्रियांका चतुर्वेदी यांच्या निर्णयाचे अनुकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यानंतर आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही संसद टीव्हीच्या शोचे सूत्रसंचालन सोडले आहे. राज्यसभेच्या 12 खासदारांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत थरूर यांनी हे पाऊल उचलले आहे. 12 खासदारांचे निलंबन मागे घेतले जात नाही तोवर या शोचे सूत्रसंचालन करणार नसल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. तिरुअनंतपुरमचे खासदार थरूर हे संसद टीव्हीचा शो ‘टू द पॉइंट’चे सूत्रसंचालन करत होते.
एका शोच्या संचालनासाठी संसद टीव्हीचे निमंत्रण स्वीकारणे भारताच्या संसदीय लोकशाहीच्या सर्वोत्तम परंपरेनुसार होते असे माझे मानणे होते. आमचे राजकीय मतभेद असले तरीही ते आम्हाला संसद सदस्याच्या रुपात, विविध संसदीय संस्थांमध्ये पूर्णपणे भाग घेण्यापासून रोखू शकत नसल्याचे हे यातून स्पष्ट होते. परंतु खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात निदर्शने करणाऱया खासदारांबद्दल एकजुटता दर्शविण्यासाठी मी ‘टू द पॉइंट’चे होस्टिंग सोडत आहे. निलंबन मागे घेतल्यास शोमध्ये पुन्हा भाग घेऊ शकतो असे थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर यांच्यापूर्वी शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना संसदेत गेंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी संसद टीव्हीच्या एका शोच्या सूत्रसंचालक पदाचा राजीनामा दिला होता. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना त्यांनी यासंबंधी पत्र लिहिले होते.