परिसरात अंधाराचे साम्राज्य : दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरवासियांच्या सुविधेकरिता प्रत्येक रस्त्यावर पथदीप बसविण्यात येत आहेत. पथदीप बसविल्यानंतर काही दिवस व्यवस्थित सुरू असतात. मात्र, देखभालीअभावी पथदीप बंद पडत आहेत. बाजारपेठेसह उपनगरांतील शेकडो पथदीप बंद असल्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले पथदीप बंद ठेवण्यामागचे प्रयोजन काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर शोभेचे पथदीप बसविण्यात आले आहेत. पण पथदीप बसविण्यात आल्यानंतर काही महिनेच सुरू ठेवण्यात आले. सध्या पथदीप बंद अवस्थेत असून समादेवी गल्ली, खडेबाजार, शिवाजी रोड, पाटील गल्लीतील काही पथदीप नादुरुस्त झाले आहेत. पण हे रस्ते वर्दळीचे असतानाही दुरुस्त करण्याच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे सदर पथदीप केवळ शोभेसाठी आहेत का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
शहरातील काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली असताना पथदीपही बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गोंधळी गल्ली, महाद्वार रोड, खानापूर रोड, एसपीएम रोड, शहापूर, कॉलेज रोड, फिशमार्केट ते गोगटे चौक, शहापूर ते येळ्ळूर रोड कॉर्नर अशा विविध भागातील पथदीप बंद आहेत. यामुळे देखभालीचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारांनी कोणत्या पथदिपांची दुरुस्ती केली, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
काही ठिकाणांचे हायमास्ट बंद झाल्यामुळे शहर व उपनगरात अंधार पसरला आहे. कंत्राटदाराला सूचना देऊनही दुर्लक्ष केले असल्याने आयुक्तांच्या आदेशाला कंत्राटदार व अधिकाऱयांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर नव्याने पथदीप बसविण्यात येत आहेत. मात्र, सध्या असलेले पथदीप बंद असल्याने नव्याने बसविण्याची गरज आहे. प्रथम असलेले दिवे सुरू ठेवा, नंतर नवीन दिवे बसवा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सध्या शहरातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी खोदाई करण्यात आली असून काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गोवावेस येथील बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतचे पथदीप बंद असल्याने समस्येमध्ये आणखीनच भर पडली आहे. यामुळे पथदिपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.