34 हजार खांबांवर बसविणार एलईडी : कंपनीकडून 7 वर्षे मिळणार सेवा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पथदीपांची देखभाल व्यवस्थित केली जात असल्याने निम्म्याहून अधिक पथदीप बंद असल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. मात्र आता या समस्येचे निवारण करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत संपूर्ण शहरात एलईडी बसविण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरातील 34 हजार पथदीप बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पथदीपांच्या देखभालीसाठी महापालिकेकडून प्रती वर्षाला 3 ते 4 कोटी खर्च केले जातात. तरीदेखील निम्म्याहून अधिक पथदीप नेहमी बंद अवस्थेत असतात. दुरुस्तीसाठी सातत्याने तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारातूनच मार्ग काढावा लागतो. दुरुस्ती आणि देखभालीसाठी कोटीचा निधी खर्च करूनही शहरातील रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. त्यामुळे शहरवासीय याबाबत सातत्याने तक्रार करीत आहेत. अखेर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत संपूर्ण शहरात एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता 54 कोटींची निविदा काढण्यात आली होती. शहर आणि उपनगरातील 34 हजार पथदीप खांबांवर नवीन एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.
पथदीपांच्या संख्येत वाढ
महापालिकेने 2016 मध्ये पथदीपांचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी शहर आणि उपनगरात 32 हजार पथदीप असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. मात्र त्यानंतर विविध रस्त्यांचे रुंदीकरण करून दुभाजकावर पथदीप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पथदीपांच्या संख्येत वाढ झाली आहे. यानुसार 34 हजार पथदीप बसविण्यात येणार आहेत. एलईडी दिवे बसविण्यासाठी 7 वर्षांच्या कराराने पीपीपी या तत्त्वानुसार कंत्राट देण्यात आले आहे. पथदीपांच्या विद्युत बिलाची रक्कम प्रती महिना 1 कोटीच्या घरात जाते. त्यामुळे शहर आणि उपनगरात एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
काम पूर्ण करण्यासाठी 10 महिन्यांचा अवधी
शहरातील प्रत्येक परिसरात एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. विविध ठिकाणी बसविण्यात आलेले जुने दिवे काढून एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अंधार दूर झाला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 10 महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. पण बहुतांश एलईडी पथदीप बसविण्यात आल्याने पथदीप देखभाल करणाऱया कंत्राटदारांना येत्या काही महिन्यात कायमची सुटी मिळण्याची शक्मयता आहे.
एलईडी दिवे बसविल्यानंतर कंपनीकडून 7 वर्षे सेवा दिली जाणार आहे. या दरम्यान दुरुस्ती तसेच दिवे खराब झाल्यास नवीन दिवे बसविण्याची जबाबदारी कंपनीची असणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने करण्यासाठी नव्या कंपनीने तत्पर रहावे, अशी अपेक्षा शहरवासियातून व्यक्त करण्यात येत आहे.