प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन शिथिल झालेले असले तरी लॉकडाऊनचे नियम आजही कायम आहेत. परंतु प्रत्येकजण आपले काम महत्त्वाचे म्हणून बाहेर पडू लागला आहे आणि रस्त्यावर प्रचंड गर्दी होऊन सामाजिक अंतराचा पूर्ण फज्जा उडाला आहे. केवळ गर्दीच नव्हे तर सर्वत्र वाहतूक कोंडीसुद्धा होत आहे.
लवकरात लवकर जर रस्ते खुले केले गेले नाही तर ही गर्दी अधिक वाढू शकते आणि सामाजिक अंतराचा नियम पूर्णत: धुळीला मिळू शकतो. आधीच बेळगावमध्ये वाहतुकीच्या नियमांचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. प्रत्येकजण युद्धभूमीवर जात असल्याप्रमाणे आपले वाहन पुढे दामटतो. त्यामुळे एक वेळ अशी येते की चार बाजूने वाहने एकत्र येतात आणि कोंडी निर्माण होते.
गेल्या दोन दिवसात शहरात अशी वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. प्रामुख्याने महात्मा फुले रोडच्या कॉर्नरवर बँक ऑफ इंडियाजवळ हा प्रकार नेहमीच घडतो आहे. टिळकवाडी, अनगोळ, शहापूर या भागातून येणाऱया नागरिकांना सध्या कपिलेश्वर उड्डाण पुलाचा आधार आहे. वास्तविक पी. बी. रोडचा वापर करणे शक्मय आहे. पण अंतर कमी होते आणि सोयीस्कर म्हणून सर्वच वाहने एसपीएम रोडवरून येत असल्यामुळे येथे वाहनाची प्रचंड गर्दी होत आहे.
टिळकवाडीतून जाणारी वाहने कॅम्पमार्गे जात असल्याने तेथेही गर्दी होतच आहे. रेल्वे ओव्हरब्रिज जोवर खुला होत नाही. तोवर ही गर्दी वाढत राहणार आहे. नागरिकांनी शक्मयतो सर्वच रस्ते अडवू नये, गर्दी करू नये, यासाठी प्रशासनाने काही रस्ते अद्याप खुले केले नाही. परंतु त्याचा परिणाम अन्य रस्त्यांवर आणि प्रामुख्याने एसपीएम रोडवर गर्दी वाढण्यामध्ये होत आहे.
त्यातच एसपीएम रोड स्मार्टसिटीच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. त्यामुळे अर्धा रस्ता निरुपयोगी ठरला आहे. रस्त्यावर सध्या दगड आणि माती याचे साम्राज्य आहे. वाहने चालविताना ही माती विखरुन धूळ उडत आहे. वाहन चालविताना चालकांची दमछाक होत असून दोन्ही बाजूंनी येणाऱया वाहनांमधून वाट कशी काढावी, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आहे.
त्यातच काही आंबा विपेतेदार हौदा रिक्षामध्ये आंब्याच्या पेटय़ा घेऊन त्याची विक्री करत आहेत. त्यांची जाहिरातबाजी पाहून लोक गर्दी करत आहेत आणि या गर्दीमुळे सामाजिक अंतराचा नियम धुडकावून लावला जात आहे. शुक्रवारी दुपारी महात्मा फुले रोडच्या कॉर्नरवर अशीच गर्दी झाली. त्यामुळे शहरवासिय बेळगावमधून कोरोना पूर्णत: गेला अशा भ्रमात वावरत आहेत की काय, असा प्रश्न पडला. नागरिकांनी जर स्वयंप्रेरणेने खबरदारी घेतली नाही, तर पुन्हा तिसऱया लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ लवकर येऊ शकते. याचे भान राखणे गरजेचे आहे.