50 कोटी जमा करण्याचे हरित लवादाचे कंपनीला आदेश : संबंधितांवर कडक कारवाईचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, विशाखापट्टणम
विशाखापट्टणम येथे घडलेल्या वायू गळती दुर्घटनेच्या तपासासाठी केंद्रीय हरित लवादाने (एनजीटी) पाच सदस्यांची विशेष समिती नियुक्त केली आहे. तसेच याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह आंध्रमधील प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आदींना नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची अपेक्षा असून अहवालाअंती योग्य निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विशाखापट्टणम येथील रासायनिक कंपनीमध्ये गुरुवारी वायू गळतीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील शेकडो बाधितांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती नाजूक असून बळींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वायू गळती रोखण्यात सध्या यश आले असले तरी भीती आणि अफवांमुळे परिसरातील लोकांनी आपली रात्र उघडय़ावरच काढली. अजूनही लोक गावांमध्ये परतलेले नसून हजारो लोकांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय हरित लवादाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून विशाखापट्टणम प्रशासनाने संबंधित कंपनीकडून 50 कोटी रुपयांची वसुली करावी, असे निर्देश दिले आहेत. सदर रकमेचा विनियोग पर्यावरणाला पोहोचलेली हानी, मृतांच्या वारसांना मदत, जनतेचे अनारोग्य आणि बाधितांवरील उपचार यासाठी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
तपास समिती करणार परिणामांचा अभ्यास
वायू गळती दुर्घटना तपास समितीमध्ये पाच जणांचा समावेश असून त्यात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. शेषसयाना रेड्डी, आंध्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु रामचंद्र मूर्ती, केमिकल इंजिनियरिंग विभागातील प्राध्यापक फुलिपती किंग, सीएसआयआरचे संचालक आणि सीपीसीबीच्या सदस्य सचिवांचा समावेश आहे. सदर समिती या दुर्घटनेमुळे परिसरातील हवा, पाणी, माती यावर कोणते परिणाम झाले याचा अभ्यासही करणार आहे. या समितीला तपासासाठी पूर्णपणे मदत करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.