प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनामुळे बंद असलेल्या माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सत्राला 23 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. जिल्हय़ातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या 458 शाळांचे शैक्षणिक कामकाज सुरू करताना कोरोनाची बाधा टाळण्यासाठी 83 हजार 136 विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यासाठी शाळांमधील 5 हजार 590 शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करताना ऍण्टीजेनला मान्यता देण्यात आली आहे. दुर्धर आजारासह सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे.
राज्य शासनाकडून कोरेनाचा प्रभाव कमी झाल्याचे लक्षात घेत शाळा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनस्तरावरून शाळा सुरू करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभुमीवर गुरुवारी व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये माध्यमिक शिक्षणसह आरोग्य विभागाला खबरदारी विषयक सुचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हय़ात 458 माध्यमिक शाळांतील 5 हजार 590 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या कोरोना चाचणीची व्यवस्था 67 आरोग्य केंद्रावर करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. त्यासाठी 5 हजार ऍण्टीजेन किटचा पुरवठा आरोग्यकेंद्र स्तरावर करण्यात आला आहे.
शाळांचे दरवाजे उघडणार पण…
कोरोनामुळे बंद असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या कामकाजाला 23 नोव्हेंबरपासून प्रारंभ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिह्यात शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक विविध बाबींचा आढावा व नियोजन यादृष्टीने शिक्षण विभागासह आरोग्य विभागाच्याही वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. कोरोनानंतर शाळा सुरु होण्याबाबत सर्वच स्तरात कमालीची उत्सूकता आहे. शासन निर्णयातील काही मुद्दे संभ्रमात टाकणारे असून शाळा व संस्थांसमोर नवे प्रश्न निर्माण करणारे आहेत. यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची पालकांना लिखित संमती अत्यावश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क व विद्यार्थ्यांची थर्मल व ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांना ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्याला कोविड सदृश लक्षणे असतील त्यांची त्वरीत तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थी संख्या, उपलब्ध वर्ग खोल्या यादृष्टीने नियोजन केले जावे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे तीन विषय शिकविण्यावर भर दय़ावा. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना स्वतःची पाण्याची बाटली आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शाळांची वेळ ठरवण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांना देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांनी सांगितले. शाळा सुरु होण्यापुर्वी त्या सॅनिटाईज करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील बहूतांश विद्यार्थी शहरी भागातील शाळांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेसची व्यवस्था करावी असे पत्र जिल्हा परिषदेकडून एसटी महामंडळाकडे पाठविण्यात आले आहे. कोरोनाचे निकषांचे पालन करुन हा प्रवास व्हावा असेही शासनाने दिलेल्या सुचनांमध्ये नमुद केले आहे.
शाळा सुरु करण्याच्या या निर्णयाकडे पालक व विद्यार्थी कसे पाहतात व शाळा याचे कसे नियोजन करतात हा भाग महत्त्वपूर्ण आहे. सर्वांच्याच मनात याबाबत अनेक शंका व प्रश्न आहेत. मात्र त्यांची उत्तरे कोराकडेही नाहीत्त्यातील काही प्रश्नांची उत्तरे शाळा सुरु झाल्यावर आपोआप मिळतील तर काही नवीन प्रश्नही समोर येतील, असे सांगितले जात आहे.
शिक्षण विभागाच्या निर्णयांचीही चर्चा
काही पालक व शिक्षकांना अजूनही 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होण्याविषयी साशंकता आहे. शिक्षण विभागाने दर दिवसाला निर्णय बदलण्याचा आपला शिरस्ता कोविड काळातही कायम ठेवल्याकडे काही शिक्षकांनी अंगुलीनिर्देश केला आहे. ऑगस्टमध्ये शाळा सुरु करणे असो, दिवाळीच्या सुटय़ा असोत, ऑनलाईन शिक्षणाबाबतचे निर्णय, त्रशक्षक उपस्थिती किंवा कोविड डय़ुटी असो शिक्षण विभागाच सावळा गोंधळ कायम टिकेचे कारण मनला आहे. या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर पुढील 2-3 दिवसात शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर याकला जाण्याचा ठाम विश्वास काही मंडळी व्यक्त करत आहेत.
महाविद्यालये सुरु करणे असुरक्षित, शाळा मात्र…
शिक्षण क्षेत्र अनलॉक करताना प्रारंभी महाविद्यालये सुरु व्हावीत व त्यानंतर कनिष्ट महाविद्यालये, माध्यमिक,उच्च प्राथमिक विभाग टप्प्याटप्प्याने सुरु होण्याची अनेक तज्ञांना अपेक्षा होती. मात्र सुजाण विद्यार्थी असलेली महाविद्यालये सुरु करणे सुरक्षित वाटत नसतानाच माध्यमिक शाळा सुरु करणे सुरक्षित कसे वाटते, असा प्रश्नही काही पालकांमधून उकस्थित केला जात आहे.