जिल्हा परिषदेच्या शाळा स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याने मुलांचं खेळणं, बागडणं थांबलं होतं. मात्र, आता शाळा सुरू होत असताना संपूर्ण शाळा वर्गखोल्यांची आणि मुलांचीही स्वच्छता राखण्यासाठी शाळा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम ठराविक काळापुरती न राबवता त्यात सातत्य ठेवत सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेत राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रभावीपणे अभियान राबवावे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळा स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेमार्फत 25 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत शाळा स्वच्छता मोहीम राबवली जात असून या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम जि. प. च्या ओरोस येथील प्राथमिक शाळेत झाला. यावेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्षा संजना सावंत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, सरपंच प्रीती देसाई, पं. स. सदस्या सुप्रिया वालावलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, उपसरपंच मनस्वी परब, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष ओरोसकर, तंटामुक्ती अध्यक्ष रमाकांत परब, देवस्थान समिती अध्यक्ष तानाजी परब, ग्रा. पं. सदस्य नागेश ओरोसकर, माजी सरपंच मंगला ओरोसकर, ग्रामसेविका सरिता धामापूरकर, प्रकाश ओरोसकर, साक्षी कोचरेकर, अनुष्का ओरोसकर, मुख्याध्यापिका श्रुष्टी मुंडले आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग स्वच्छतेत अव्वल ठरेल!
अध्यक्षा सावंत म्हणाल्या की, कोरोनामुळे गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. तरीदेखील मुलांची उपस्थिती कमी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात 25 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत जि. प. च्या सर्व 1394 शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत सातत्य ठेवल्यास मुले शाळेतून परत घरी जाताना कुठलाही आजार, विषाणू घेऊन जाणार नाहीत. ती आरोग्यदृष्टय़ा सदृढ राहतील. स्वच्छता मोहिमेमुळे जिल्हय़ात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला अधिक गती येईल आणि सिंधुदुर्ग राज्यात स्वच्छतेत अव्वल ठरेल. कोरोना काळात गावात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरपंचांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. यावेळी त्यांनी ओरोस प्राथमिक शाळेला सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी तीन लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच दोन पुरुष शिक्षकही दिले जातील, असे आश्वासन दिले.
समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी प्राथमिक शाळेतील शौचालयांचा
प्रश्न तसेच शिक्षकांचे प्रश्न मांडून ते सोडविण्याची ग्वाही दिली. तर सुंदरता मनाची हवी. तरच खऱया अर्थाने स्वच्छता निर्माण होते, असे सभापती शर्वाणी गावकर यांनी सांगितले.
विनायक ठाकुर यांनी राज्यात स्वच्छता सर्व्हेक्षण सुरू होऊन केंद्राची समिती मूल्यमापनासाठी येणार असल्याने गावागावात एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले.
यावेळी विजय चव्हाण, मुश्ताक शेख, सुप्रिया वालावलकर, प्रीती देसाई, नागेश ओरोसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी, तर सूत्रसंचालन तेंडुलकर यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी
श्रीमती भाकरे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर स्वच्छता रॅली काढून शाळेची साफसफाई करण्यात आली.