वार्ताहर संगमेश्वर
संगमेश्वर शास्त्रीपुलाजवळील घरांलगतची दरड मुसळधार पावसामुळे कोसळल्याने 3 घरांना धोका निर्माण झाला असून तेथील कुटुंबियांना सुरळीत स्थळी हलवण्यात आले आहे. महामार्गावर पुनर्वसन, रामकुंड वळणावर दरडी कोसळल्या आहेत. संगमेश्वर बाजारपेठेत मोरी तुंबल्याने बाजारपेठेला पुराचे स्वरुप प्राप्त झाले होते. सलग दुसऱया दिवशी मुसळधार सुरुच राहिल्याने संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
सलग 2 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळू लागल्या आहेत. शास्त्राr पुलाजवळील निजामुद्दीन दाउद शहा, इस्माइल दाउद शहा आणि निसार शेख यांच्या घराशेजारी असलेली दरड कोसळल्याने या तिन्ही घरांना धोका निर्माण झाला आहे. तहसीलदार सुहास थोरात, सरपंच अनंत शिगवण, पोलीस निरीक्षक उदय झावरे आदींनी जावून पाहणी केली. या तीनही कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. संगमेश्वर बाजारपेठेत गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी थेट बाजारपेठेतील शिरून बाजारपेठेला पुराचे स्वरुप प्राप्त झाले होते. ग्राहक तसेच दुकांनाना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुनर्वसन माभळे येथे दरडी कोसळून गटाराचे पाणी थेट महामार्गावर आल्याने वाहनचालकांना गाडी चालवणे धोकादायक होत आहे. रामकुंड व कुरधुंडा येथील दरडी धोकादायक झाल्या आहेत. यावर्षी ठेकेदाराने गटारांची कामे व्यवस्थित न केल्यामुळे माभळे, कुरधुंडा, तुरळ आदी ठिकाणी रस्त्यावर येणाऱया पाण्यामुळे महामार्गावरील वाहतुकीसमोर अडचणी निर्माण होत आहेत.
कोसुंब येथे दरड कोसळली
बुधवारी सकाळी पांगरीपाठोपाठ कोसुंब येथील धोकादायक दरडी कोसळू लागल्या आहेत. कोसुंब येथील दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. यावर्षीच संगमेश्वर ते देवरुख रस्त्याचे रंदीकरणाचे करण्यात आले आहे. मात्र दरडी कोसळू लागल्याने वाहनचालकांची कसरत संपलेली नाही.
सांगवे पुलाचा भराव खचला
याचवर्षी केलेला सांगवे पुलाचा भराव बुधवारी पहिल्याच पावसात खचला असून हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सप्तलिंगी नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलांमुळे अनेक गावे जोडली गेली आहेत. पुलाचा भराव आणखी खचला तर संबंधित गावांचा संपर्क पूर्णपणे तुटणार आहे.
देवरूख – संगमेश्वर रस्त्याला तळय़ाचे स्वरूप
मंगळवारच्या पावसात देवरूख – संगमेश्वर रस्त्याला तळयाचे स्वरूप आले होते. एमआयडीसी ते साडवली गणेशमंदिर मार्गावरची वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. मध्यरात्रीनंतर पाण्याचा जोर ओसरला. दरम्यान या रस्त्याचे रूंदीकरण करताना गटारांची कामे व्यवस्थित न झाल्याने असा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. साडवली गणेशमंदिरजवळ मोरीचे काम पूर्ण न झाल्याने पावसाळयात हा भाग अधिक धोकादायक ठरणार आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
नद्याच्या पातळीत वाढ
बुधवारी दुसऱया दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोनवी, शास्त्राr व बावनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अलकनंदा आणि असावी नदी दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. ओझरखोल येथील शेतीमध्ये पुराचे पाणी घुसले असून शेतजमिनीचा काही भाग वाहून गेला आहे.
मारुती मंदिर येथील उत्खनन केलेला भराव ओढयामध्ये
संगमेश्वर मारुती मंदिरजवळील डोंगरावर अनाधिकृत उत्खनन केलेली माती स्मशानजवळील ओढयामध्ये वाहून आली आहे. मोरीमध्ये ही माती साचून देवरुख ते संगमेश्वर मार्गावर पुराचे पाणी चढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बाजारपेठेला पुराचा धोका कायम
सतत पडत असलेल्या पावसामुळे शास्त्राr व सोनवी नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसण्याची शक्यता गृहित धरूने बाजारपेठेतील घरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.