प्रतिनिधी / कुडाळ:
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सेवानिवृत्त शिक्षिका, राष्ट्रसेवादलाच्या कार्यकर्त्या व सामाजिक कार्यकर्त्या तसेच कोचरा-रवळनाथवाडी येथील रहिवासी आणि पत्रकार मीराताई माधवराव जाधव (93) यांचे शनिवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले.
विविध शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात तसेच महिलांचे प्रश्न, रोजगार यासाठी त्यांनी काम केले. पाट येथील एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळावर त्या काही वर्षे पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. विविध संस्थांवरही त्या कार्यरत होत्या.
सावंतवाडी येथील वि. स. खांडेकर विद्यालयाच्या त्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहून राज्य सरकारने त्यांना आदर्श पुरस्कार प्रदान केला होता. त्यानंतर त्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठरल्या होत्या.
सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार बाप्पा धारणकर यांच्या मीरा धारणकर (जाधव) या कन्या. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही त्यांची पहिल्यापासूनच धारणा होती. सावंतवाडी कन्याशाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. ‘कुमार साहित्य’ या कार्यशाळेच्या माध्यमातून वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या ‘सत्यप्रकाश’ साप्ताहिकात ‘बाललीला’ नावच्या सदरात बालकुमारांसाठी लिहिण्यास सुरुवात केली. मॅट्रिक झाल्यानंतर एस. टी. सी. ची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होऊन विसाव्या वर्षी त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर बी. ए. बी. एड. हिंदी शिक्षक सनद या पदव्या त्यांनी मिळविल्या. खांडेकर विद्यालयात काम करीत असताना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. असा पुरस्कार मिळविणाऱया त्या जिल्हय़ातील पहिल्या महिला ठरल्या.
त्यानंतर ‘सत्यप्रकाश’चे कार्यकारी संपादक व नंतर संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सेवानिवृत्तीनंतर त्या आपल्या कोचरा या गावी राहायला आल्या. तिथेही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. महिलांसाठी विविध उपक्रमांतून त्यांनी काम सुरू केले. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळावर एकनाथ ठाकुर यांच्यासमवेत पदाधिकारी म्हणून काम केले. मुलींसाठी बहि:शाल वर्ग सुरू करून सामाजिक जाणीव निर्माण करून दिली. महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.
ग्रामीण महिलांसाठी मार्गदर्शन-प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यांनी होमगार्डची लेडीज फ्लॅटून कमांडर, समाजकल्याण बोर्ड सदस्य, सावंतवाडी जेल व्हिजीटर, आकाशवाणी रत्नागिरी सल्लागार समिती, जिल्हा सहकारी बोर्ड, एस. टी. महामंडळ विभागीय सल्लागार समितीवर सदस्य म्हणून काम केले. या पदांचा उपयोग त्यांनी समाजासाठी केला. हे सर्व करीत असताना व्यवहारदक्ष माता, पत्नी, मुलगी, बहीण, सासू, आजी या भूमिकाही त्यांनी तेवढय़ाच ताकदीने निभावल्या.
साप्ताहिक ‘व्याध’मधून त्यांनी समाजप्रबोधनपर लिखाण केले. ‘सत्यप्रकाश’मधून ‘बी. माधव’ या टोपणनावाने लिखाण केले. कोचरा वाचनालयातही त्यांचा सहभाग होता.
पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे, भाचे व अन्य परिवार आहे. चिदा जाधव यांच्या त्या मातोश्री, तर ‘सत्यप्रकाश’चे संपादक हर्षवर्धन धारणकर व सत्यजीत धारणकर यांच्या त्या आत्या होत. शनिवारी सकाळी कोचरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.