-जिल्हय़ात 5 वीचे 1320, 8 वीचे 518 विद्यार्थी उत्तीर्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने उशिरा घेण्यात आलेल्या 5 वीच्या पूर्व उच्च प्राथमिक आणि 8 वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल बुधवार 24 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षांच्या पूर्वनियोजित तारखा सुरूवातीला बदलल्या गेल्या होत्या. कोरोना नियमांचे पालन करीत या परीक्षा घेणे अडचणीचे असल्याचे शिक्षणतज्ञांनी मत व्यक्त केले होते. त्यामुळे या परीक्षा होणार की नाही, यावर अनिश्चितेचे ढग पसरले होते. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी तयारी केली होती. पण परीक्षा होत नसल्याने पालक, विद्यार्थी संभ्रमात होते. अखेर 12 ऑगस्ट रोजी ही परीक्षा जिल्हय़ातील 139 परीक्षा केंद्रावर पार पडली. या परीक्षेसाठी 5 वीचे 7,775 तर 8 वी चे 3,657 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
तज्ञांशी चर्चा करून शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्याची घोषणा करण्यात आली. या शिष्यवृत्ती परीक्षांमधूनच विद्यार्थ्याच्या बुध्दय़ांकाचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे या परीक्षेचा विचार करून शासनाच्या शिक्षण विभागाने ही परीक्षा 12 ऑगस्ट रोजी घेतली. या परीक्षेचा निकाल 24 नोव्हेंबर रोजी दुपारी राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ात 5 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या चिपळूण तालुक्यातील 88ख1 पैकी 208 विद्यार्थी उत्तीर्ण, दापोलीतील 772 पैकी 137, गुहागरमधील 608 पैकी 67, खेडमधील 880 पैकी 398, लांजातील 596 पैकी 90, मंडणगड 300 पैकी 37, राजापूर 808 पैकी 156, रत्नागिरी 1402 पैकी 300, संगमेश्वर 942 पैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 8 वीमधील परीक्षार्थीमध्ये चिपळूण तालुक्यातील 569 पैकी 101 विद्यार्थी उत्तीर्ण, दापोलीतील 294 पैकी 53, गुहागरमधील 321 पैकी 22, खेडमधील 449 पैकी 90, लांजातील 271 पैकी 35, मंडणगड 119 पैकी 8, राजापूर 350 पैकी 29, रत्नागिरी 637 पैकी 125, संगमेश्वर 360 पैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या केवळ 16.97 टक्के
जिह्यातून या परीक्षेस बसलेल्या 5 वीमधील 7775 पैकी फक्त 1320 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल केवळ 16.97 टक्के आहे. याचबरोबर 8 वी मधील 3657 पैकी 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या वर्गाचा निकाल 14.16 टक्के इतकाच लागला आहे. परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही घटली होती. हा निकाल कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे घटला आहे की अन्य कारणे आहेत, यावर विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.