समितीच्या सिंहाला निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार : मोटारसायकल रॅलीत मोठय़ा संख्येने सहभाग
वार्ताहर / किणये
सीमाप्रश्नाच्या लढय़ाला बळकटी देण्यासाठी समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना निवडून देण्याचा व समितीच्या सिंहाला दिल्लीत पाठवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी किणये परिसरात शुभम शेळके यांचा झंझावाती प्रचार करण्यात आला.
किणये भागातील रणकुंडये, शिवनगर, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी या गावांमध्ये प्रचारफेरी काढून मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. शुभम शेळके यांना या भागातील नागरिकांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. सीमाबांधवांवर सातत्याने सरकारकडून अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म. ए. समितीच्या उमेदवारालाच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रचारफेरीची सुरुवात रणकुंडये गावातून झाली. म. ए. समितीच्या ज्ये÷ मंडळींनी शुभम शेळके यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. संपूर्ण गावात घरोघरी जाऊन निवडणुकीबाबत प्रचार केला. त्यानंतर शिवनगरात प्रचारफेरी झाली. किणये गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावच्या वेशीतून प्रचाराला प्रारंभ झाला. गावातील विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मीदेवीचे शेळके यांनी दर्शन घेतले. या प्रचारफेरीत खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही सहभाग घेतला
होता.
शेळके यांची बहाद्दरवाडी गावातही रॅली काढण्यात आली. गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शेळके यांचे स्वागत करून गावचा पाठिंबा दर्शविला. कर्ले गावात प्रचारफेरी झाल्यानंतर जानेवाडी गावात प्रचारफेरी काढण्यात आली. जानेवाडी गावातील सातेरी माऊली मंदिरात शेळके यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. गावातील समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला.
कर्ले गावात शेळके यांची प्रचारसभा घेण्यात आली. प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य विनायक पाटील होते. शुभम शेळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून सीमाप्रश्नाबद्दल माहिती दिली. म. ए. समिती व सीमाप्रश्नासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांचे स्मरण करून व मराठी माणसांची एकजूट दाखविण्यासाठी शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन सी. ए. सांबरेकर यांनी केले. यावेळी किणयेसह पश्चिम भागातील समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.