साठ सत्तरच्या दशकात पांढऱया रंगाचे काय वेड पसरले होते. भुताखेतांच्या कृष्णधवल सिनेमात स्त्रीलिंगी भुते पांढऱया साडय़ा नेसून हातात मेणबत्त्या घेऊन गाणी गायच्या. स्त्रियांच्या भुतांना फक्त पांढऱया साडय़ा नेसण्याची सक्ती होती, तशीच नायकाचे वडील निवर्तल्यावर शिवणकाम किंवा धुणीभांडी करणाऱया नायकाच्या आईलादेखील फक्त पांढऱया साडीची सक्ती होती. दिवसभर (किंवा चित्रपटभर) धुणीभांडी आणि शिवणकाम करूनही आईसाहेबांची साडी अगदी चकाचक पांढरी दिसे. सिनेमाच्या सुरुवातीलाच नायिकेचा प्रेमभंग झाला असेल तर तिचे पुन्हा प्रेम आणि लग्न जुळेपर्यंत तिलादेखील फक्त पांढरी साडी नेसवली जाई. या पांढरी साडी प्रकरणाला एक मजेदार आणि आचरट अपवाद होता. श्रीयुत राज कपूर यांच्या कोणत्याही विषयावरील. म्हणजे गरीबी-श्रीमंती किंवा सामाजिक विषमता किंवा समाजातील भ्रष्टाचार सिनेमाच्या कथेत नायिकेच्या घरातले कोणीही निवर्तले नसले तरी किमान एकदा पांढरी साडी नेसून पडद्यावर येई आणि प्रेक्षकांना तिचे एक स्नानदृश्य दाखवले जाई.
पुरुष नटांनी देखील शुभ्र रंगाचा नको इतका पुरस्कार केला. पांढरी शुभ्र तुमान-पूर्ण बाह्यांचा नीट खोचलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि पायात काळे टोकदार चामडी शूज हा पोषाख नट लोकांना आवडायचा. पण त्याच्या प्रेमात पडून त्याची नक्कल करणे परवडत नसे. तरी देखील क्वचित कॉलेजमध्ये मुले असे पांढरेशुभ्र पोषाख करून यायची. या पोषाखाची रया जास्तीत जास्त तासभर टिकायची. कारण वर्गात काही लिहून घेताना मनगटापाशी शर्ट काळा होई. उन्हाळय़ाचे दिवस असतील तर कॉलर झटकन मळून जाई. कुठेही बसताना त्या ठिकाणी स्वच्छ हातरुमाल ठेवून त्यावर बसण्याची सावधगिरी बाळगली नाहीतर त्या पांढऱया शुभ्र तुमानीवर भलत्याच ठिकाणी काळे डाग दिसत.
मात्र तो काळच असा होता की लोकांना शुभ्र रंगाचे वेड लागले होते. हे शुभ्र कपडे दुकानातून धुवून आणि कडक इस्त्री करून आणले जात, त्यांना ‘भट्टीची कापडं’ अशी संज्ञा होती.
एक उल्लेख सांगायलाच हवा. असे पांढरे कपडे, डोळय़ांवर काळा चष्मा आणि लोखंडी नाल ठोकलेले चामडी बूट घालून गळय़ात ट्रांझिस्टर अडकवून कोणी खाडखाड पावले आपटीत आला तर त्याला ‘खडकी हिरो’ म्हटले जाई. यातल्या खडकी शब्दाचा खडकी गावाशी काही संबंध नव्हता नसावा.