भारतीय रेल्वेचे कोटय़वधींचे नुकसान
वृत्तसंस्था / भटिंडा
पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेवाहतुकीवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी रेल्वेमार्गावर ठाण मांडून आहेत. शेतकरी आंदोलनामुळे 2,225 हून अधिक मालगाडय़ा रोखाव्या लागल्या आहेत. याचबरोबर 1,350 हून अधिक रेल्वेगाडय़ा रद्द किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले आहेत. रेल्वेमार्गानजीक सुरू असलेल्या आंदोलनामुळे रेल्वेला कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.
पंजाबमध्ये शेतकरी संघटना कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. निदर्शनांदरम्यान अनेक रेल्वेमार्गांवर रेल्वेसेवा संचालित करणे अशक्य ठरले आहे. अशा स्थितीत सर्व औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरवठा करणेही शक्य झाले नाही. याच कारणामुळे पंजाबात वीजकपात करावी लागत आहे.
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे धरणे आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. अमरिंदर यांच्यासह काँग्रेसचे आमदार तसेच अन्य नेतेही आंदोलन करत आहेत.