उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत : गृह मंत्रालयाच्या बैठकीनंतर निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेतकरी संघटनेने प्रजासत्ताक दिनी नव्या कृषी कायद्याविरोधात काढलेल्या ट्रक्टर मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयोजक शेतकरी नेत्यांना लुकआऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी शेतकरी नेत्यांना नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचाराबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच 300 हून अधिक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
शेतकरी संघटनांच्या ट्रक्टर मोर्चाला परवानगी देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांचे पालन करण्याचे टाळून शेतकरी संघटनांनी विश्वासघात केला. त्यानंतर गोंधळाला सुरूवात झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. प्रक्षोभक वक्तव्यांचे व्हिडीओही पोलिसांना प्राप्त झाले असून हिंसाचारात सामील असणाऱयांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजचा आधार घेतला जात आहे. दरम्यान, हिंसाचारावेळी दिल्ली पोलिसांनी संयम बाळगल्यामुळे पोलिसांच्या कारवाईत कुणाचाही मृत्यू झाला नाही, अशी भूमिका दिल्लीचे पोलीस प्रमुख एस. एन. श्रीवास्तव यांनी मांडली आहे.
प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व नेत्यांना लुकआऊट नोटीस पाठवण्यात आली असून त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग, कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगतसिंग मनसा, बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गेहलोत यांच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश आहे.
शेतकऱयांविरुद्ध स्थानिकांचे आंदोलन
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असलेल्या सिंघू बॉर्डरवर स्थानिकांकडून आंदोलन सुरू झाले आहे. सिंघू बॉर्डर परिसरातील रहिवासी असल्याचा दावा करत काही नागरिकांच्या गटाने शेतकऱयांच्या आंदोलनस्थळी मोर्चा काढला. यावेळी दिल्ली महामार्ग मोकळा करण्याची मागणी करत स्थानिकांनी शेतकऱयांविरोधात निदर्शने केली.
राकेश टिकैत यांचे पोलिसांना विविध प्रश्न
प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारादरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱया व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी का रोखले नाही? असा प्रश्न भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी उपस्थित केला आहे. लाल किल्ल्यापर्यंत काही लोक पोहोचले असताना पोलिसांनी गोळीबार का केला नाही? यावेळी पोलीस कुठे होते? झेंडा फडकवणारा इसम तिथपर्यंत कसा पोहोचला? पोलिसांनी त्याला अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत.