प्रतिनिधी/कोल्हापूर
उत्तरप्रदेश येथे केंद्र सरकारमधील एका राज्यमंत्र्याने काही गुंडांना सोबत घेऊन आंदोलनास बसलेल्या शेतकऱयांवर गाडी घालून चिरडले. या घटनेचा शेतकरी कामगार पक्षातर्फे निषेध करण्यात आला. याबाबतचे पत्रक शेकापने प्रसिद्धीस दिले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की,उत्तर भारतातील शेतकरी गेली दहा महिने राज्याच्या व दिल्लीच्या सीमेवर नूतन कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलन करत आहेत. ऊन, वारा,पाऊस, या गोष्टींना न डगमगता सातत्याने आपला सहभाग हाजारोंच्या संख्येने घेत आहेत. या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. उत्तरप्रदेशमधील मुझफरनगर येथील महापंचायतीला दहा लाखांच्यावर शेतकरी उपस्थित होते. याचे उट्टे काढण्यासाठी केंद्रातील एका राज्यमंत्र्याने काही गुंडांना सोबत घेऊन आंदोलकांच्या बसलेल्या लोकांवर गाडी घालून आठ शेतकरी चिरडले . ही घटना निंदनीय आहे. याचा आम्ही पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. या गुंडांचा म्होरक्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे.तरी या सर्व आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी या पत्रकातून केली आहे. पत्रकावर शहर चिटणीस बाबुराव कदम यांची सही आहे.