प्रतिनिधी/ बेळगाव
विविध मागण्यांसाठी तसेच जाचक कायदे रद्द करण्यासाठी उत्तर भारतातील शेतकऱयांनी जे आंदोलन छेडले आह। त्याला स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाठिंबा देवून सरकारने तातडीने जाचक कायदे रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुणीही जमीन खरेदी करू शकते, एपीएमसी संदर्भात जो जाचक कायदा काढण्यात आला आहे तो देखील मागे घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या कायद्यांमुळे मुळ शेतकरी बाजुला फेकला जाणार आहे. कार्पोरेट कंपन्या जमीनी खरेदी करणार आहेत. त्यामुळे शेतकऱयाला केवळ कामगार म्हणून काम करावे लागणार आहे. तेंव्हा हे जाचक कायदे रद्द करा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. एन. आर. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवलीला वैभव मिसाळे, सविता तराळे, बाळाराम फडके, जगन्नाथ हुलजी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.