प्रतिनिधी / करमाळा
सन 2018 – 19 मध्ये गाळप केलेल्या उसाचे प्रति टन 236 रुपये प्रमाणे राहिलेले सुमारे साडेचार कोटी रुपये व शेअर्स पोटी गोळा केलेले 14 कोटी रुपये असे सुमारे वीस कोटी रुपये शेतकर्यांच्या घामाची रक्कम भैरवनाथ शुगर चे चेअरमन शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी. अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी थेट निवेदनाद्वारे शिवसेनेचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
एका शिवसेनेच्या आमदाराच्या बद्दल शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख यांनी तक्रार केल्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. महेश चिवटे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन 2018 19 मध्ये उसाला 2200 रुपये प्रति टन भाव देतो असे भैरवनाथ शुगर चे चेअरमन आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत उल्लेख करून वृत्तपत्रातून बातम्या दिल्या मात्र प्रत्यक्षात बिले देताना 236 रुपयाने बिले दिलेली नाही. गेली दोन वर्षांपासून शेतकरी उसाच्या पैशासाठी विहाळ येथील त्यांच्या कारखान्यात हेलपाटे मारत आहेत. मात्र आमदार तानाजी सावंत यांनी त्या ठिकाणी ठेवलेले कामगार गाव गुंड शेतकऱ्यांना दमदाटी करून हाकलून देतात पत्रकारांनी या बाबतीत खुलासा विचारला तर पत्रकारांना सुद्धा सावंत बंधू उडवाउडवीची उत्तरे देतात शिवाय दहा ते बारा वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडून वीस हजार रुपये शेअर्स रक्कम म्हणून आमदार तानाजी सावंत यांनी गोळा केली.
ही रक्कम जवळपास चौदा कोटी रुपयांची आहे. या शेतकऱ्याच्या रकमेला सावंत कुठलीही व्याज देत नाहीत किंवा लाभांश देत नाहीत. शेतकरी शेअर्स पैसे परत मागण्यास गेल्यास त्याला कारखान्यात हाकलून दिले जाते. आमदार तानाजी सावंत यांच्या शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणे यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. वारंवार तक्रारी मोर्चे आंदोलने करून सुद्धा तानाजी सावंत यांना घाम फुटत नाही. आता या प्रकरणी थेट उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांचे पैसे परत द्यावेत. असे आदेश आमदार तानाजी सावंत यांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना महेश चिवटे म्हणाले की शिवसेनेचे पांघरून घेतल्यामुळे तानाजी सावंत यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस शेतकऱ्याचं होत नाही.
इतर पुढारीही त्यांच्यापुढे नांगी टाकतात त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा परत मिळावा म्हणून आम्ही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना एकत्र घेऊन माजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच उद्धव ठाकरे व शिवसेना नेते अनिल देसाई यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.