प्रतिनिधी / इस्लामपूर
काँग्रेस पक्षाने ७० वर्षामध्ये काय केले, असा सवाल भाजप सरकार करत आहे. मात्र १९६० साली हरित क्रांती घडवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. देशातला शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या बॉर्डवर थांबला आहे. त्यांना आत प्रवेश दिला जात नाही. यासाठी रस्त्यामध्ये खिळे ठोकले गेले आहेत. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. ७० वर्षात शेतकऱ्यांना काँग्रेसने कधीही अशी वागणूक दिली नाही, अशी टीका सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतिक जयंत पाटील यांनी केली.
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे कायदे रद्द व्हावेत, यामागणीसाठी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या संयोजनाखाली व प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आष्टा येथून ट्रॅक्टर गोर्चास सुरुवात झाली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर समारोप झाला. दरम्यान तहसीलदार रविंद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील साडेतीनशेच्यावर ट्रॅक्टर घेवून शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील, महाराष्ट्र धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.चिमण डांगे, तालुकाध्यक्ष विजय पाटील, सुश्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.