प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱयांबरोबरच शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या ग्रामीण भागातील युवकांचेही प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या नुकसानग्रस्त कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी किमान एक वर्षाची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना देण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तथा सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ता दिलीप पाटील (कोल्हापूर) यांनी या मागणीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे राज्यातील विदर्भ, मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथे शेतीचे आणि शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱयांना सावरण्यासाठी मदत आणि दिलासा देण्याची गरज आहे. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात हजारो युवकांनी ट्रक्टर, पोल्ट्री फार्म, दूग्ध व्यवसाय, शेळीपालन आदी शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या पोटी त्यांना व्याजाचा परतावा मिळतो. पण आता अतिवृष्टीमुळे त्यांना कर्जाचा हप्ता भरणे शक्य नाही. त्यामुळे हप्ता भरण्यासाठी आणि व्याजपरताव्यासाठी किमान एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी. यासाठी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी केल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱयांना गुपकर्ज द्या
ज्या शेतकऱयांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱयांना शेतीपूरक उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करावी. अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे गुप कर्ज वाटप करण्यात यावे, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केली आहे.