भूतलावर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने माणूसदेखील निर्मिला आणि या मानवाला सगळय़ा प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मेंदूदेखील दिला. आपण 21 व्या शतकात प्रवेश केला आणि गेल्या दशकापासून ते आत्तापर्यंत आम्ही आमचा देदीप्यमान विकास केलेला आहे. पण हा विकास होत असताना खरंच या माणसाला माणूसपण राहिलंय का? हा प्रश्न मनामध्ये मात्र थैमान घालू लागला आहे. अमानुष कृत्याचं दर्शन आपल्याला वृत्तपत्र व वेगवेगळय़ा माध्यमातून जेव्हा डोळय़ांसमोर येतं तेव्हा मन अस्वस्थ होऊन जातं. बलात्कारासारखं निंदनीय कृत्य, स्त्रियांवरील वाढत चाललेले अत्याचार, माणुसकीच्या नावाला काळीमा फासणाऱया या सर्व गोष्टी कधी थांबणार आहेत? म्हणूनच आजची स्त्री अबला की सबला हा प्रश्नदेखील निरुत्तरीत आहे. प्रत्येक माणूस विचारी असतो. माणसाला मेंदू असतो अन् त्या मेंदूत अक्कल ही असतेच. पण त्या अकलेचं आज खोबरं झालेलं आहे.
आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आज आपल्या पायांजवळ लोटांगण घालीत असतात. अशा सुखासीन माणसांना रस्त्यावर भीक मागून पोट भरणारी बालके कशी काय दिसतील? त्यांच्यातही माणूस नावाचा प्राणी आहे, हे कसं दिसेल? त्यांचं जीवन कोणी फुलवूच शकणार नाही का? त्याचबरोबर आज अनेकांचे देह व्यसनांनी जखडलेले आहेत. ते मुक्त होऊच शकणार नाहीत का? आणि जर होत असतील तर मग कसे आणि केव्हा? डॉ. अनिल अवचट (बाबा) यांनी मुक्तांगणामधून हे कार्य सुरू केलेलं आहे. पण अशा मुक्तांगणाची आज गावागावांतून खरी गरज आहे.
माणूस किती जगतो याला महत्त्व नाही तर त्यापेक्षा तो कसा जगतो, याला फार महत्त्व आहे. आयुष्यातील खडतर प्रवासाने यश संपादन होत असते. सर्वप्रथम विद्यार्थी घडत असताना शिक्षकांनी त्यांच्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आई-वडिलांनी चांगले संस्कार पेरणे गरजेचे आहे. पालकांनी बेजबाबदार न राहता त्यांच्यामध्ये चांगले विचार बिंबवणे खूप गरजेचे आहे. माणसाची सर्वांत महत्त्वाची गरज नुसते शिक्षण नाही, त्याचे चारित्र्य आहे. नुसतेच पुस्तकी ज्ञान न घेता चारित्र्य संवर्धन होणेही गरजेचे आहे. त्याने स्वत:चे रक्षण होत असते.
जीवन जगत असताना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावू तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते.
प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो, त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचीत असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे ‘माणुसकी’. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहे, ‘माणुसकी’ हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे, असे चित्र आहे. ऐकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय?
या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते, कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते, तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा!
आपल्या भारतात अनेक युगपुरुष होऊन गेले, त्याचबरोबर नारीशक्तीनेही आपले अस्तित्व व सामर्थ्य जनमानसात उमटवलं. त्यातलेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले आदी महान व्यक्ती आहेत. या सर्वांनी स्वत: चंदनाप्रमाणे झिजून इतरांच्या आयुष्याला व इतरांना सुगंध दिलेला आहे. आजही अशा विचारसरणीची माणसं आहेत; पण ती मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच. बाबा आमटे, मंदाकिनी आमटे, महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार घेऊन ऐश-आरामात घरी बसू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. झिजणाऱया जीवांना नवजीवन देण्याचं काम त्यांनी आपल्या श्रमातून केलं. याचं कारण अशाच माणसांना माणुसकीतील माणूसपण कळलं होतं. आणि हे जेव्हा प्रत्येक मानवाला कळेल, तेव्हा माणुसकी हरवलेला या समाजात खरा माणूस म्हणून ओळखला जाईल.