भारताने वापरू दिले होते हवाईक्षेत्र
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेने झटका दिल्यावरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोलंबो दौऱयात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची संधी सोडलेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर हाच एकमेव वादाचा मुद्दा असून तो केवळ चर्चेद्वारेच सोडविला जाऊ शकतो. सत्तेवर आल्यावर भारत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेचा सल्ला दिला होता, असे उद्गार इम्रान यांनी काढले आहेत. भारताने इम्रान यांच्या विमानाला स्वतःचे हवाईक्षेत्र वापरण्याची अनुमती दिली होती.
सत्तेवर आल्यावर भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला होता. तसेच भारतीय उपखंडात मतभेदांवरील तोडगा चर्चेद्वारे काढणे हा एकच मात्र असल्याचे मोदींना सांगितले होते. चर्चा घडवून आणण्यास अपयशी ठरलो असलो तरीही अखेरीस हे घडणार अशी अपेक्षा आहे. युरोपीय देशांप्रमाणे आम्ही एकत्रित नांदायला हवे, असे इम्रान यांनी कोलंबो येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
भारतीय उपखंडातील सर्व वादांवर संवादाच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणणाऱया पाकिस्तानच्या पंतप्रधानाने सांगितले आहे. याचबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्यास पाकिस्तान भूमिका बजावू शकतो अशी शेखीही त्यांनी मिरविली आहे.
तत्पूर्वी भारताने इम्रान खान यांच्या विमानाला स्वतःचे हवाईक्षेत्र वापरण्यास अनुमती दिली होती. इम्रान खान हे मंगळवारी भारताच्या हवाईक्षेत्रातून श्रीलंकेत पोहोचले होते. 2019 मध्ये पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानासाठी स्वतःचे हवाईक्षेत्र खुले करण्यास नकार दिला होता.
श्रीलंकेने दिला होता झटका
श्रीलंकेने यापूर्वीच इम्रान यांचे संसदेतील प्रस्तावित भाषण रद्द केले आहे. भारताच्या दबावामुळे श्रीलंकेने हे पाऊल उचलल्याचा आरोप पाककडून करण्यात आला. इम्रान यांच्या भाषणामुळे भारतासोबतचे संबंध बिघडण्याची भीती श्रीलंकेला सतावत होती.