सरसंघचालक डॉ.भागवत यांचे संघ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी/ फोंडा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा गतिविधीद्वारे समाजाच्या आचरणात बदल घडवून आणता येऊ शकतो. या बदलांद्वारे देशाचा सर्वांगीण विकास करणे शक्य आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
भागवत हे सध्या गोवा दौऱयावर असून वेलिंग म्हार्दोळ येथे त्यांचा मुक्काम आहे. संघाच्या सहा गतिविधींच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. पर्यावरण संरक्षण, समरसता, गोसेवा, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन व धर्मजागरण असे हे सहा उपक्रम संघाने गतिविधीअंतर्गत तयार केले आहेत. या गतिविधीच्या अंतर्गत कोकण प्रांतात विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून या उपक्रमांचा डॉ. भागवत यांनी आढावा घेऊन कार्यकर्त्यांना आपले कार्य अधिक समाजोपयोगी व्हावे या दृष्टीने मार्गदर्शन केले.
पर्यावरणाविषयी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, ‘हरित घर’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने वृक्षारोपण करावे. पाणी व ऊर्जेची बचत करावी. ओल्या कचऱयापासून घरातच खत तयार करावे. घरात छोटे पक्षी घर असावे. या हरित घर संकल्पनेचा विस्तार पर्यावरण संरक्षण, गतिविधी अंतर्गत विस्तार करण्याची सूचना त्यांनी केली. घरोघरी एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकचा साठा होऊ नये यासाठी इको ब्रिक्सच्या वापरासंबंधी प्रचार करावा. पर्यावरण गतिविधी अंतर्गत पाणी वाचवा, झाडे लावा आणि प्लास्टिक कमी वापरा या तीन मुद्यांच्या अंतर्गत अधिकाधिक कार्य विस्तार व्हावा, अशी सूचना त्यांनी केली.
समरसता गतिविधीच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी गतिविधीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. भेदभावमुक्त समाज रचना तयार करणे, विषमता पसरविणाऱया घटनांना रोखण्याचा प्रयत्न करणे, विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी सोहळे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन साजरे करणे. त्यासाठी समाजमनास तयार करतालना, आपल्या आचरणात योग्य ते बदल घडवून आणणे व भेदभावरहित कुटुंब रचना उभी करण्यास प्रयत्नशील राहणे या उद्दिष्टांना पूरक ठरतील, अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना केली.
ग्रामविकास गतिविधीअंतर्गत कोकण प्रांतातील 71 गावामधील 1362 कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जल, जंगल, जमीन, जन, ऊर्जा, जीव आणि गो विकास या सप्त संपदेवर शाश्वत ग्रामविकास करणे आवश्यक आहे, असेही नमूद केले. कुटुंब प्रबोधन या सूत्राचा आढावा घेताना 27 जिल्ह्य़ांमध्ये 666 शेतकऱयांना गो आधारीत अर्थात जैविक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकूण 135 कार्यकर्ते या उपक्रमासाठी कोकण प्रांतात कार्यरत आहेत. प्रत्येक शेतकऱयाच्या घरी किमान एक देशी गाय असावी, असे उद्दिष्ठ डोळय़ासमोर ठेवण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात 41 गो पालक शेतकरी कुटुंबानी 1 लाखाहून अधिक गोमय दिवे तयार केले होते. घरात देशी गाय असल्याने देशी गाईचे दूध व तूप उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या गोवा दौऱयाच्या काळात डॉ. भागवत संघाशी संबंधित कार्यकर्ते व पदाधिकाऱयांशी संवाद साधत आहेत.