प्रतिनिधी/ नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱयावेळी झालेल्या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत असताना नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची जैश-ए-महंमद या कुख्यात दहशतवादी संघटनेने रेकी केल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी याबाबतची माहिती तातडीने महाराष्ट्र पोलीस आणि नागपूर पोलिसांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये एका दहशतवाद्याला जेरबंद केले होते. त्याच्याकडील चौकशीमध्ये सहा महिन्यांपूर्वीच नागपूरमध्ये रेकी करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही याला दुजोरा दिला असून संघ मुख्यालयासह नागपूरमध्ये सर्वत्र बंदोबस्तामध्ये वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. याआधीही ऑक्टोबर 2020 मध्येही आरएसएस नेत्यांवर हल्ल्याचा कट आखला होता. तर गेल्या काही महिन्यांमध्ये दहशतवादी कृत्ये नियंत्रणात आली होती. मात्र आता दहशतवादी संघटनांकडून पुन्हा एकदा दहशतवादाचे भूत उकरुन काढण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचेही स्पष्ट होत आहे.
शहरात अनेक ठिकाणी हल्ल्याची शक्यता
केंद्रीय यंत्रणांच्या सुचनेनुसार नागपूरमध्ये जैश संघटना मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखत आहे. काश्मीरमध्ये पकडलेल्या एका दहशतवाद्याने याविषयी माहिती दिल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर वेगाने यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून संपूर्ण नागपूरमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय सह रेशीम बागमधील संघाच्या डॉ हेडगेवार स्मफती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे.
मुख्यालयासह अन्य प्रमुख ठिकाणे लक्ष्य
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी एका दहशतवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील चौकशीतून ही माहिती मिळाली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या ही कुख्यात दहशतवादी संघटना यामागे असून नागपूर शहरात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखत आहे. त्यांच्या माणसांनी संघ मुख्यालयासह शहरातील प्रमुख ठिकाणे दहशतवाद्यांनी शोधून काढली असून त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.
जुलै 2021 मध्ये रेकी
सहा महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै 2021 मध्ये जैशच्या काही दहशतवाद्यांनी ही रेकी केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरएसएस मुख्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी नागपूर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
संपूर्ण शहरात नाकाबंदी
आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, संशयितांनी नागपूरच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो काढले असल्याचे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे. त्यांचे व्हिडिओही बनवले असावेत असा अंदाज आहे. सध्यातरी आम्ही संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे. तसेच बाहेरून येणाऱया प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासले जात आहे. पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून त्यांना अलर्टचे आदेश दिले आहेत. शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी आत आणि बाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांची पडताळणी केली जात आहे. उपराजधानीशी जोडलेल्या सर्व महामार्गांवर अवजड वाहनांची सखोल तपासणी सुरू केली असल्याचे ते म्हणाले.
परिसरात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीवर बंदी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अमितेशकुमार यांनी केले आहे.
2020 मध्येही हल्ल्याची चर्चा होती
याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये संघनेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचल्याची चर्चा होती. त्यावेळी दहशतवादी हा हल्ला करण्यासाठी आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) किंवा स्फोटकांनी भरलेले वाहन (व्हीआयईडी) वापरू शकतात, असे सांगण्यात आले. त्यादरम्यान, इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांतील नेत्यांना लक्ष्य करण्यात आले.
2006 मध्ये संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
जून 2006 च्या पहाटे चार वाजता संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. एक लाल दिव्याची ऍम्बेसेडर कार मुख्यालयाच्या दिशेने येत होती. गाडीवरील लाल दिवा पाहून जवान सावध झाले. सैनिकांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला, पण गाडी थांबली नाही. यानंतर मुख्यालयापासून सुमारे 100 मीटर अंतरावर गाडी थांबली. जेव्हा जवान गाडीजवळ पोहोचला तेव्हा त्याने कारमध्ये 20 ते 22 वर्षे वयोगटातील 3 मुले असल्याचे पाहिले. पोलिसांनी मुलांना तपासासाठी खाली उतरण्यास सांगितल्यावर गाडी अडसर तोडून पुढे निघाली. गतिरोधक तोडून गाडी पुढे सरकली असता पोलिसांना त्या मुलांसोबत शस्त्रs दिसली. धोका ओळखून पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर कारमधील दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत पोलिसांनी कारमधील तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.