ऑनलाइन टीम / मुंबई :
संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) संघाच्या विचारांचे कुलगुरु आहेत, त्यामुळे तेथे काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. तशी स्थिती राज्यात निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला त्यामध्ये एबीव्हीपी आणि भाजपच्या गुंडांना नक्कीच तेथील विद्यापीठ प्रशासनाची साथ मिळाली असणार आहे. जेएनयूचे कुलकुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत.
गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचारांच्या लोकांना भरणा झाला आहे. त्यामुळे माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, जेएनयू सारखी स्थिती राज्यातील विद्यापीठांमध्ये तयार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठांमधील संघाच्या विचारसरणीच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द केल्या पाहिजेत.